गुवाहाटी -आसाममधील पूरस्थिती गुरूवारी आणखीच गंभीर बनली. त्या राज्यात पुरामुळे सुमारे 5 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 12 जिल्ह्यांतील बऱ्याच भागांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचा सर्वांधिक फटका बरपेटा जिल्ह्याला बसला. तेथील 3 लाख 35 हजारहून अधिक लोक नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत.
प्रशासनाने 7 जिल्ह्यांत 83 मदत छावण्या सुरू केल्या आहेत. तिथे 14 हजारहून अधिक नागरिकांनी आसरा घेतला आहे. पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ, मीठ आणि मोहरीच्या तेलाचा पुरवठा केला जात आहे.
आसाममधील 1 हजार 366 गावे पुरामुळे जलमय बनली आहेत. त्यामुळे 14 हजार हेक्टर्सहून अधिक क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.