शासनाकडून मिळेना निधी; लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर
सातारा – जिल्ह्यात 2023-24 या वर्षी दोन हजार 238 वैयक्तिक शौचालयांपैकी एक हजार 295 शौचालये पूर्ण झाली आहेत. त्यातील 800 लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यांवर अनुदान जमा झाले आहे; परंतु उर्वरित 495 लाभार्थ्यांनी शौचालये पूर्ण बांधूनदेखील त्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. निधीअभावी शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. ही महत्त्वपूर्ण योजना आहे. देशातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबे वैयक्तिक शौचालये बांधण्यास असमर्थ असल्याने, या कुटुंबांमधील सदस्य उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याने केंद्र सरकारने शौचालय अनुदान योजना सुरू केली. ग्रामीण भागातील कुटुंबांचे राहणीमान सुधारणे, हा या योजनेमागे शासनाचा मुख्य उद्देश आहे.
शौचालय अनुदान योजनेंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येते. या योजनेतील अनुदान दोन टप्प्यांमध्ये देण्यात येते. शौचालय अनुदान योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवली जाते. यात केंद्र सरकार 60 टक्के आणि राज्य सरकार 40 टक्के रक्कम देते. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केले जातात.
या योजनेत 2022-23 मध्ये तीन हजार 213 वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी तीन कोटी 85 लाखांचे अनुदान आले होते. हे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाल्याचे दिसून आले. मात्र, 2023-24 मध्ये दोन हजार 238 शौचालयांपैकी एक हजार 295 शौचालये पूर्ण झाली आहेत. त्यामधील 495 लाभार्थ्यांना शौचालये पूर्ण होऊनही अनुदान मिळालेले नाही. यासाठी जिल्हा परिषदेने निधीची मागणी केली असली, तरी अद्याप शासनाकडून निधी मिळालेला नाही.
दरम्यान, विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांत वैयक्तिक शौचालय अनुदान, कोविडमध्ये काम करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य किंवा इतर काही योजनांसाठी प्रत्यक्षात निधी मिळत नाही. केंद्र व राज्य सरकार केवळ घोषणा करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.