राज्यातील वीज उत्पादन वाढीसाठी नव्या योजना
मुंबई, दि. 26 – पाचव्या योजनेत राज्यातील वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन अर्थमंत्री मधुकरराव चौधरी यांनी आज दिले. ते पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये औष्णिक वीज उत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार असून त्या विभागातील नियोजित उद्योग व्यवसायास त्याचा फायदा होईल.
निवृत्तांसाठी पेन्शन कमिशन नेमा
पुणे – केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत ज्याप्रमाणे वेळोवेळी वेतन कमिशन नेमते त्याप्रमाणे त्यांनी सेवा निवृत्त सेवकांच्या बाबतीत पेन्शन कमिशन नेमावे, असा ठराव आज महाराष्ट्र राज्य सेवा निवृत्त सेवकांच्या पहिल्या अधिवेशनात सर्वसंमत करण्यात आला. सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. ए. नाईक यांचे अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न झाले.
स्वस्त धान्यासाठी आंदोलन
पुणे – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघटित करून “स्वदेशी आणि स्वस्त अन्नधान्य’ आंदोलन चालू करण्याचा निर्धार सुभान वैद्य यांनी व्यक्त केला. सरकार अन्नधान्य उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करीत नाही व जे काही प्रयत्न करतात ते
सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही, म्हणूनच धान्याच्या किमती वाढतात असे सांगून ते म्हणाले, आज खेडेगावातील तरुण वर्ग शहराकडे ओढला गेल्यामुळे जमीन कसून धान्य काढण्यास पुरेसा वाव मिळत नाही म्हणून त्या वर्गास आपापल्या खेड्यातच ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे वेतन आयोग
मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनास एकसूत्रता व सुधारणा करण्यासाठी वेतन आयोग नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली.