सिक्कीमच्या लोकशाहीचे भारताने रक्षण करावे
गंगटोक, दि. 30 – आमची लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी जरूर ते सर्व उपाय योजावेत, अशी विनंती सिक्कीम मंत्रिमंडळाने भारत सरकारकडे केली आहे. भारतीय संसदेवर दोन सिक्किमी प्रतिनिधींना सिक्कीम विधिमंडळातर्फे निवडून देण्यात येणार होते, परंतु येथील मध्यवर्ती न्यायालयाने या निवडणुका स्थगित करण्याचा आदेश दिला, त्या संदर्भात मंत्रिमंडळाने भारताला ही विनंती केली आहे. सर्व मंत्र्यांच्या सह्या असलेले एक निवेदन काल रात्री काढण्यात आले. त्यात सिक्किमी जनतेला असे आवाहन करण्यात आले आहे की, लोकशाहीच्या शत्रूपासून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी दक्ष राहा!
अशी पाखरे येती अन्…
पुणे – लक्ष्मीरोडवर नेहमी गर्दी आणि रोमिओ यांची धमाल असते. आज त्यांच्या जोडीला पंखाच्या मुंग्यांनी धमाल उडवून दिली. साडेसातच्या सुमारास अचानक ह्या मुंग्यांचे थवेच्या थवे दिव्यांवर घोंगाऊ लागले आणि त्यांनी लोकांना फिरणे अशक्य करून टाकले. दुकानदारांनाही दुकानात काम करता येईना. अखेर त्यांनी दिवे मालवून टाकले. वीज बोर्डानेही काही काळ रस्त्यावरचे दिवे बंद केले. तेव्हा कुठे ही पाखरे आली तशी निघून गेली आणि थोड्या वेळात सारे पूर्वीसारखे झाले. अंधारलेला लक्ष्मीरस्ता पुन्हा प्रकाशात झगमगू लागला. थोडा वेळ का होईना वीजकपातीत सरकारला मदत करण्याचे पुण्य या पाखरांना मिळाले! या पाखरांचे आगमन म्हणजे पावसाची पूर्वसूचनाच, असा अनुभव आहे.