काश्मीरबाबतच्या समझोत्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली, दि. 23 – काश्मीरप्रकरणी जो समझोता केंद्र सरकार व शेख अब्दुल्ला यांचे दरम्यान झाला त्याबाबत पार्लमेंटमध्ये पंतप्रधान जे निवेदन करणार आहेत त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निवेदनाबाबत मंत्रिमंडळाने तीन तास चर्चा केली.
आता नवा प्रयोग नको
जम्मू-काश्मीरची जनता आता हे राज्य म्हणजे भारताचा अविभाज्य भाग आहे असे मानू लागली आहे. आता पुन्हा तेथे नवा प्रयोग करणे अयोग्य आहे, असे लालकृष्ण अडवाणी म्हणाले. काश्मीरच्या भारतातील सामिलीकरणाची जी प्रक्रिया होत आहे, तीवर शेख अब्दुल्लांशी झालेल्या कराराने अनिष्ट परिणाम होईल, असेही अडवाणी म्हणाले आहेत.
गंगा पाणी वाटपासंबंधी भारत-बांगला वाटाघाटी
नवी दिल्ली – गंगा नदीच्या पाण्याच्या वाटपासंबंधी भारताशी वाटाघाटी करण्यासाठी बांगला देशचे आठ जणांचे एक शिष्टमंडळ काल येथे आले. बांगला देशाच्या पूरनियंत्रण व जलविकास खात्याचे मंत्री सेरनिआबात यांचेकडे शिष्टमंडळाचे नेतृत्व आहे.
युरोपात आयुर्वेदाचा अभ्यास होणार
नवी दिल्ली – आयुर्वेदाने पाश्चिमात्य डॉक्टरांना आकर्षित केले असून त्याचा अभ्यास करण्यासाठी युरोपात लवकरच एका अभ्यासगटाची स्थापना होणार आहे. “आयुर्वेदामधील कल्पनांना संबंध जगाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे’, असे उद्गार डच जीवशास्त्रज्ञ डॉ. टी. मेइडेरसॅम यांनी काढले. बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी 3 महिने आयुर्वेदाचा अभ्यास केला.
धर्मातीतता संगीताचा अविभाज्य भाग
पुणे – शास्त्रीय संगीत हेच केवळ अभिजात संगीत नाही. समाजात सर्व प्रकारच्या संगीताची गरज असते. धर्मातीतता हा संगीताचा अविभाज्य भाग आहे, असे विचार प्रा. अरविंद मंगरूळकर यांनी व्यक्त केले.
मराठी नाट्यसंगीत
मराठी नाट्यसंगीत हा भारतातील एकमेव प्रकार आहे. तो सुंदर आहे. पण त्याला भाषेची मर्यादा पडली आणि रवींद्र संगीताप्रमाणे ते भाषेपुरतेच मर्यादित राहिले. संगीत मुळात महाराष्ट्रात नव्हते. ते दत्तक घेतल्यासारखे आहे. पण कीर्तन मात्र इकडूनच तामीळनाडूमध्येही गेले आहे.