पुणे – ही निवडणूक म्हणजे दोन पक्ष किंवा दोन व्यक्ती यामधील लढा नसून तो दोन तत्त्वांचा लढा आहे. जनता व सरकार यांचा संघर्ष आहे. जनता जिंकते की हरते यावर लोकशाहीचे भवितव्य ठरणार आहे. लोकशाहीने जनतेला दिलेले अधिकार अबाधित राहावयाचे असतील तर या लढाईत जनताच विजयी झाली पाहिजे, असे विचार जनता पक्षाचे प्रमुख नेते जगन्नाथ जोशी यांनी जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेचा नारळ फोडताना शनिवार वाड्यासमोर विराट सभेत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी होते.
भारतीय मोटारगाड्या परदेशात लोकप्रिय
नवी दिल्ली – भारतात तयार करण्यात आलेल्या मोटारगाड्या परदेशात दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन प्राप्त झाले आहे. सन 1975-76 मध्ये या वाहनाच्या निर्यातीपासून 423 कोटी रुपये किमतीचे परकीय चलन मिळाले. त्यामागील वर्षी ही रक्कम 313 दशलक्ष रुपये होती. सन 1976-77च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर 1976) 23.88 कोटी रुपयांच्या किमतीच्या मोटारगाड्यांची निर्यात करण्यात आली आहे.