पुणे -राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 1 जानेवारी ते 25 एप्रिलदरम्यान लावलेल्या 282 सापळ्यांमध्ये तब्बल 403 शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक केली. तसेच अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणात 12 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे हा आकडा तब्बल 415 वर गेला आहे. या कारवाईमध्ये पुणे परिक्षेत्र राज्यात द्वितीय क्रमांकावर असल्याचेही समोर आले आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, लाचखोरी प्रकरणात महसूल-भूमि अभिलेख व नोंदणी विभाग अव्वल असून, त्यापाठोपाठ पोलीस विभागाचा क्रमांक आहे. त्यामुळे “कुंपणच शेत खात आहे,’ अशी परिस्थिती आहे. एकीकडे गलेलठ्ठ वेतन, विविध भत्ते, सर्व शासकीय सुविधा पदरात पाडून घेत असतानाही हे सरकारी कर्मचारी लाचखोरीने प्रशासनाची अब्रू घालवत आहेत, अशीच स्थिती आहे. गोरगरिबांची किरकोळ कामे अडवून चिरीमिरी मागणारे हे शासकीय कर्मचारी अलगद जाळ्यात अडकत असून, वर्षनिहाय त्यांची संख्याही वाढत आहे. प्रशासकीय सुविधा ऑनलाइन झाल्याने भ्रष्टाचार कमी झाल्याचे सांगण्यात येते. तरीही हे लाचखोर वाढत आहेत.
नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक सापळे
नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक 56 सापळे यशस्वी झाले असून, त्यात 87 आरोपींना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पुणे क्षेत्रात 53 सापळ्यांत 75 आरोपींना गजाआड करण्यात आले. तर सर्वाधिक कमी 14 सापळे मुंबई विभागात लावण्यात आले. तेथून 16 जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत अपसंपदेचे चार गुन्हे दाखल झाले असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली. तसेच अन्य भ्रष्टाचारप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला.