नवी दिल्ली, – भारताने गेल्या सात वर्षात 38 हजार कोटी रूपयांची संरक्षण सामग्री निर्यात केली आहे अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर सोसायटीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात 85 हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. या क्षेत्रात खासगी क्षेत्रातील गुंतवणूक 18 हजार कोटी रूपयांवर गेली आहे असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे 12 हजार कंपन्या सरकारच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राकडे वळल्या आहेत. सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील संशोधन आणि विकासाचे कार्य विस्तारले असून या क्षेत्रातील स्टार्टअपही वाढले आहेत असे ते म्हणाले.