बिजवडी, {मधुकर गलांडे} – पुणे, सोलापूर,अहमदनगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला वरदायिनी ठरलेल्या उजनी जलाशयातील प्रवासी वाहतूक वेळोवेळी जीवघेणी ठरत आहे. या बेकायदेशीर प्रवासी वाहतूकीला कोणाचा वरदहस्त आहे? कारवाई का होत नाही? याबाबत आता पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. कारण उजनी जलाशयात 16पेक्षा जास्त ठिकाणी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक होत आहे. याच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणार्या बोटीचालकांवरती कारवाई होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उजनी जलाशयात दोन दिवसांपूर्वी प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जलाशयात प्रवासी वाहतूक करण्यासाठी विविध परवान्यांची आवश्यकता नाही. जलप्रवास करताना कोणतीही सुरक्षित साधनांचा वापर केला जात नाही. जलवाहतूक करणार्या बोटींना कोणतेही नियम व अटी नाहीत.
त्यामुळे राजकीय वरदहस्त असला म्हणजे सगळं काही चालतंय, अशी परिस्थिती अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. उजनी जलाशयाचे पुणे आणि सोलापूर हद्दीतील पाणलोट क्षेत्रात 16 पेक्षा जास्त ठिकाणी जीवघेणी बेकायदेशीर जलवाहतूक होते. या जलवाहतुकीकडे जलसंपदा व महसूल विभागातील कोणाचेही लक्ष नाही अथवा अंकुश नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी कळाशी- कुगाव दरम्यानच्या दुर्दैवी अपघाताला जलसंपदा विभाग व महसूल विभाग जबाबदार असल्याचे बोलले जात असून तसा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कळाशी-कुगाव प्रवासी वाहतूक करणार्या बोटींवर सुरक्षा साहित्य जॅकेट ठेवले जात नसल्याने जलप्रवास करणार्या प्रवाशांची सुरक्षितता रामभरोसे होती. या प्रवास वाहतूक करणार्या बोटींना जलसंपदा विभागाने रजिस्टर अथवा परवाना दिलेला नंबर आहेत का.
या बोटीची नोंद कुठे केली आहे? किंवा या बोटीचा विमा उतरवलेला आहे का? याबाबत कोणीही चौकशी करत नाही किंवा करायला जातही नाही. तसेच या बोटी चालवणार्या लोकांकडे व बोटीकडे जलसंपदा विभाग जाणून बुजून कानाडोळा करत आहे का? त्यामुळे अशा बेकायदेशीर जलवाहतुक करणार्या बोटींची संख्या अधिक झाली असून हा प्रकार फोफावला असल्याने अनेक निरापराध लोकांचा जीव गेला आहे.
या ठिकाणी बेकायदेशीर जलवाहतूक
1) वाशिंबे ते गंगावळण
2) चिकलठाण ते पडस्थळ
3)कुगाव ते शिरसोडी
4)कुगाव ते कळाशी
5)कुगाव ते कालठण
6)ढोकरी ते शहा
7)केतुर ते चांडगाव
8)शिरसोडी ते चिकलठाण
धक्कादायक पाच घटना
-पहिल्या घटनेत 26 जणांना जलसमाधी
करमाळा तालुक्यातील टाकळी येथे उजनी जलाशयात 1993 मध्ये टाकळी ते पळसदेव प्रवासी वाहतूक करणार्या होडीचा अपघात होऊन सुमारे 26 जणांना दुर्दैवी जलसमाधी मिळाली होती. त्या घटनेत निरापराध 26 लोकांचा अंत झाला होता. या घटनेचे तीव्र प्रसाद त्यावेळेस ही उमटले होते.
-दुसरी घटना
2017 मध्ये माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते या भागातील उजनीच्या जलाशयावरती सहलीसाठी आलेल्या डॉक्टरांचा इंदापूर तालुक्यातील आजोती येथे होडी उलटून चार डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
-तिसरी घटना
करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नकार्याला आलेल्या अकलूज येथील बापलेकाचा होडी उलटून मृत्यू झाला होता, ही घटना मार्च 2021 मध्ये घडली होती.
-चौथी घटना
2022 च्या जानेवारीमध्ये चिकलठाण येथे मुंबईहून साखरपुड्यासाठी आलेले मच्छीमारांचे दोन नातेवाईक होडीतून फेरफटका मारताना त्यातील एकाने पोहण्यासाठी उडी मारली त्याला वाचवण्यासाठी एकाने दुसर्याने उडी मारली आणि बुडणार्याने गळाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. त्या घटनेच्या दोघांचाही मृत्यू झाला.
-पाचवी घटना
दोन दिवसांपूर्वी उजनी जलाशयात बोट पलटी होऊन सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जो पर्यंत काटेकोरपणे या घडलेल्या घटनांकडे प्रशासन पाहत नाही व पाण्यातील प्रवासी नियमांचं पालन होत नाहीत तोपर्यंत अशा घटना व अपघात घडतच राहणार आहेत.