बिजवडी, (वार्ताहर)- उजनीच्या भीमापात्रात परवा संध्याकाळी वार्याने बोट पलटी होऊन अपघात झाला होता. या अपघातात सहा जण बुडन बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. परवा संध्याकाळपासून या बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. ती तब्बल 36 तासानंतर थांबली. आज (गुरुवारी) सकाळी सहा मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आले.
गोकुळ दत्तात्रेय जाधव (वय 30), कोमल गोकुळ जाधव (वय 25), शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3 वर्ष, सर्व रा. झरे, ता. करमाळा), होडी चालक अनुराग अवघडे (वय 35), गौरव धनंजय डोंगरे (वय 16) अशी बोट अपघातात बुडून मृत झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेमध्ये सोलापूर पोलिसात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून बाहेर आल्याने ते बचावले. घटना घडल्यापासून लगेचच बचाव कार्याला सुरुवाती झाली होती. मात्र पहिल्या दिवशी अंधार असल्यामुळे शोध घेण्यास अडचणी येत होत्या.
दुसर्या दिवशी सकाळपासूनच एनडीआरएफच्या टीमने तपास कार्याला सुरुवात करून, दुसर्या दिवशी एक बोट आणि मोटरसायकल काढण्यात यश मिळवले; मात्र एकही मृतदेह हाती लागला नाही. साधारण साडेचार ते पाचच्या दरम्यान पुन्हा वादळी वारा सुरू झाल्यानंतर दुसर्या दिवशीचा तपास कार्य थांबले होते. तिसर्या दिवशी सकाळी मृतदेह उजनीच्या पाण्यावर तरंगताना दिसून आले.
या अपघातानंतर करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील काळाशी च्या उजनी पात्राच्या दोन्हीही बाजूला मृतांचे नातेवाईक बसले होते. मृतदेह पाण्यावरती तरंगताना पाहून दोन्हीही बाजूच्या नातेवाईकांचा संयमाचा बांध फुटला आणि एकच आक्रोश होऊ लागला. घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायी होऊन गेली. त्यामुळे दोन्हीही गावात दुःखाची छाया दिसून आली. सापडलेले मृतदेह हे सर्व करमाळा तालुक्यातील असल्याने इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर प्रशासनाच्या ताब्यात दिले.