मंचर (पुणे) – उत्तर प्रदेश येथून एका पिकअपमध्ये गाडीमध्ये दाटीवाटीने 33 जण पुण्याकडे जात असताना मंचर येथील पोलिसांनी त्यांना पकडले. सोशल डिस्टन्स आणि तोंडाला मास्क नाही म्हणून चालकावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 27) दुपारी करण्यात आली; परंतु सुमारे सातशे किलोमीटर दूरवर येऊनही रस्त्यामध्ये त्यांना कोणत्याही पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस जवानांनी हटकले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंचर बस स्थानकानजीक पोलिसांनी पिक अप गाडी (यूपी 90 एटी 0801) थांबवली. पोलिसांनी चालक रमेश बदलावा कुमार याच्या विरोधात कारवाई केली. परंतु उत्तर प्रदेशातून येताना अंदाजे 35 ते 40 पोलीस ठाणे आणि 700 किलोमीटर अंतर येऊनही रस्त्यामधील पोलीस बांधवांनी किंवा पोलिस अधिकाऱ्यांनी या गाडीला थांबवले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 33 जण दाटीवाटीने बसल्याने करोना संदर्भात असणारी भीती किंवा सोशल डिस्टन्स नाही याबाबत पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे
बुधवारी सकाळी अवसरी फाटा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी पोलिसांनी धडक कारवाई करावी. सोशल डिस्टन्स किंवा मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती, दुकान चालक, हॉटेल चालक, किंवा वाहन चालक चालकांवर कारवाई करावी असे आदेश दिले होते. त्यानुसार मंचर पोलिसांनी धडक कारवाई करत पिकअप चालकाकडील कागदपत्रे ताब्यात घेऊन अवैध प्रवासी वाहतुकीचा आणि करोना संदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मंचर पोलिसांनी दाखल केला आहे. ही कारवाई करतेवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गजानन टोम्पे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, वाहतूक शाखेचे मंगेश लोखंडे, जनार्दन सापटे, संदेश काळडोके यांनी कारवाईत भाग घेतला.