पिंपरी – करोनाचे रुग्ण कमी झाल्याने संपूर्ण राज्यातील करोनाचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून लग्न सोहळ्यांवर असलेले विघ्न दूर झाले आहे. परिणामी यंदा लग्नसोहळे धूमधडाक्यात पार पडणार आहेत. पुढील तीन महिन्यांत लग्नासाठी 32 मुहूर्त आहेत.
लग्न सोहळ्यांमध्ये मंगल कार्यालये, केटरर्स, दागिने, फोटो शुटिंग, कपडे यासह विविध खर्चातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या नियमांमुळे लग्नसमारंभ एका दिवसात व साध्या पद्धतीने केले जात होते. त्यामध्ये उपस्थितांनाही मर्यादा असल्याने बहुतांश खर्च कमी केला जात होता. मात्र, आता निर्बंध नसल्याने मेंहदी, हळदीपासून संगीत रजनी ते रिसेप्शन या कार्यक्रमामुळे लग्नकार्य चार ते पाच दिवसांपर्यंत पोहचले आहे. त्यामध्ये प्री-वेडिंग शूट, सिनेमा फोटोग्रॉफी, मेंहदी, संगीत रजनी, रिसेप्शन यासारख्या कार्यक्रमात वेगवेगळ्या थिम वापरल्या जातात. यंदा जुलै महिन्यापर्यंत लग्नाचे 32 मुहूर्त आहेत. एप्रिल महिन्यात 6, मे मध्ये सर्वाधिक 11 मुहूर्त आहेत. तर जूनमध्ये 9 व जुलैमध्ये 6 मुहूर्त आहेत. एप्रिलमधील मुहूर्तांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
मे महिन्याच्या पुढील मुहूर्तांसाठीही चौकशी सुरू आहे. यंदा मुहूर्त कमी असले, तरी लग्नसंख्या जास्त आहे, अशी माहिती मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी दिली. केटरिंग व्यावसायिकाच्या माहितीनुसार, यंदाचे लग्न मुहूर्त एप्रिलच्या मध्यंतरास सुरुवात होणार आहेत. त्यामुळे या महिन्यातील काही तारखांची नोंदणी झाली आहे. खाद्यपदार्थांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे दरातही वाढ करावी लागत आहे. लग्नसराईमध्ये कापड उद्योगही तेजीत असतो. या सिझनमध्ये सुमारे 15 ते 17 कोटींची उलाढाल शक्य असल्याचे कापड विक्रेत्यांनी सांगितले. लग्न समारंभातील मुख्य आकर्षण असलेल्या दागिन्यांचीही मागणी वाढली आहे.