पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांची नोंद “यूडायस प्लस’ प्रणालीवर करण्यात आली. यात सन 2021-22 च्या तुलनेत सन 2022-23 या वर्षातील विद्यार्थी संख्येत मोठी तफावत आढळली आहे. तब्बल 3 लाख 678 विद्यार्थी घटल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. यामुळे समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकावर परिणाम होणार आहे.
ही माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या परिपत्रकाद्वारे उघड झालेली आहे.
यात जिल्हा परिषद शाळांमध्ये 3 लाख 13 हजार 764, नगरपालिका शाळांमध्ये 8 हजार 742 विद्यार्थी कमी झाले आहे. तर, दुसऱ्या बाजूला महापालिकांच्या शाळांमध्ये 21 हजार 738 विद्यार्थी वाढल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने समग्र शिक्षा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकेसह अन्य शालेय साहित्य देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी “यूडायस प्लस’ प्रणालीवर करण्याचे बंधन शाळांवर आहे. या नोंदणीनुसारच शासनाकडून निधी दिला जातो. पण, आता हा निधी घटण्याची चिन्हे आहेत.
विद्यार्थ्यांची नोंद “यूडायस प्लस’ प्रणालीमध्ये करण्याबाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार व व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही विद्यार्थ्यांची 100 टक्के नोंद झालेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे शाळानिहाय विद्यार्थी संख्येची खात्री करून राहिलेल्या विद्यार्थ्यांची नोंद त्वरित प्रणालीत करण्याच्या सूचना शिक्षण परिषदेच्या सहायक संचालक सरोज जगताप यांनी सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थी संख्या खरीच कमी झाली की यूडायस प्लस प्रणालीत विद्यार्थ्यांची नोंद न झाल्याने विद्यार्थी संख्येत तफावत निर्माण झाली हे समोर येणार आहे.