मुंबई – देशातील आणि परदेशातील करोनाविषयक वातावरण आता निवळत चालले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढू लागला आहे. भारताने सप्टेंबर महिन्यामध्ये 23 हजार 259 कोटी रुपयांच्या दागिन्यांची निर्यात केली.
गेल्या वर्षातील सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या निर्यातीत 29 टक्के इतकी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये केवळ 17 हजार 936 कोटी रुपयांच्या दागिन्यांची निर्यात झाली होती. दागिने निर्यातदार प्रोत्साहन परिषदेने या संदर्भात म्हटले आहे की, सरकारने या क्षेत्राला निर्यातीचे जे उद्दिष्ट दिले होते ते आता पूर्ण झाले आहे.
आगामी काळातही ही निर्यात वाढून भारताला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वर्षी दागिने निर्यात वाढावी याकरिता केंद्र सरकारने बऱ्याच उपाय योजना केल्या होत्या. निर्यात करणाऱ्या दागिने उत्पादकांना सोन्याच्या आयातीवर जास्त शुल्क लागत नाही.
गेल्या वर्षी करोनाच्या काळामध्ये कामगार आपल्या गावी गेले होते. त्यामुळे दागिने उत्पादकांना निर्यात करता आली नव्हती. आता बरेच कामगार आपल्या कामावर परत आले आहेत. भारतीय दागिन्यांना जगातील विविध देशातून चांगली मागणी आहे. त्याचा सदुपयोग करण्याची गरज आहे. सरकार आणि दागिने उत्पादक या क्षेत्रात समन्वयाने प्रयत्न करू लागले असल्याचे वातावरण आहे.