विजय घोरपडे
नागठाणे – नागठाणे, बोरगाव (ता. सातारा) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातला असून सुमारे 25 जणांवर जीवघेणा हल्ला करून त्याने अक्षरशः लचके तोडले आहेत. बोरगाव येथील गंभीर जखमी एका महिलेसह चावा घेतलेले अनेक रूग्ण सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत.
नागठाणे (ता. सातारा) येथे दि. 28 रोजी सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरू होती. पंचक्रोशीतील अनेक गणेशभक्त मिरवणुकीत सामील झाले होते. याच वेळी या पिसाळलेल्या कुत्र्याने गर्दीत अनेक जणांना चावा घेत धुमाकूळ घातला. अंधार असल्याने हे कुत्रे गर्दीत घुसलेले अनेकांच्या ध्यानात आलेच नाही. त्यामुळे काही जणांचे अक्षरशः लचके तोडले. काही जणांच्या हे ध्यानात आल्यावर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला हाकलण्यात यश आले. गर्दीमुळे त्याला मारणेही मुश्कील झाले होते.
नागठाण्यातून हाकलल्यानंतर या कुत्र्याने बोरगावकडे मोर्चा वळवला. दि. 29 रोजी त्याने बोरगाव येथील चालत जाणाऱ्या महिलेवर पळत येऊन कुत्र्यांने अंगावर झेप घेत गाल, भुवया, कपाळ, ओठ अशा असंख्य ठिकाणचे लचके तोडले. संबंधित महिला रस्त्यावर खाली पडली तरी कुत्र्याने हल्ला सुरुच ठेवला होता. त्यानंतर बबन माळवे, दत्तात्रय साळुंखे, नथु साळूंखे, यश लोहार यांनाही जोरदार चावे घेतले. बोरगाव येथील नागरिकांनी काठ्या वगैरे घेऊन या कुत्र्यास घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते एका ऊसाच्या शेतात घुसल्याने त्यास मारता आले नाही. त्यातच हे पिसाळलेले कुत्रे चावल्याने अजून एक कुत्रे पिसाळल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू होती. त्यामुळे आता परिसरातील नागरिक, लहान मुले तसेच शालेय मुलांमध्ये या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे.
घराबाहेर पडतानाही मनात धास्ती आहेच. आता घरातून बाहेर पडताना आपापली काळजी घेणं गरजेचे आहेच .त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीच्यावतीने या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करून बंदोबस्त करावा, अशी मागणी नागठाणे बोरगाव परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.
कुत्रे पिसाळण्याचे प्रमुख कारण
सप्टेंबर ऑक्टोबर महिने प्रामुख्याने कुत्र्यांचा प्रजननकाळ मानले जातात. यावेळी काही पाळीव व भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी गावोगावी दिसून येतात. यात कुत्र्यांमध्ये जोरदार भांडणंही होतात. अनेक वेळा कुत्र्यांचे कान, मानेचा दुसऱ्या कुत्र्याने लचका तोडल्यानंतर झालेली जखम त्यास जिभेने चाटता येत नाही. तसेच भटके असल्याने उपचारही होत नाही. परिणामी त्या जखमेत अळ्या, किडे पडून ते पिसाळते. दिसेल त्या माणसाला व प्राण्यांना चावत सुटते.
उपाययोजना गरजेची
गावोगावी ,शहरांमध्ये आता भटक्या कुत्र्यांच्या झुंडी दिसतात. अनेक ठिकाणी लहान मुले, वयोवृद्धांना ही कुत्री लक्ष्य करत आहेत. यात जीव गेल्याचीही उदाहरणे आहेत. ग्रामीण भागात शेळ्या, बकऱ्या, वासरू, रेडकांच्या शिकारीही या झुंडीकडून झाल्या आहेत. गावोगावी चिकन सेंटर व चायनीज सेंटरच्या वेस्टेजवर जगणारी अनेक भटकी कुत्री झुंडीने फिरतात. या वेस्टेजची विल्हेवाट सेंटरचालक योग्य रितीने लावत नाहीत. गावाशेजारील ओढयात अथवा उघड्यावर दिवसभरातील वेस्टेज अंधार पडताना टाकले जाते. यावर तिथे कायम वास्तव्यास असणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या झुंडी जगून निघत आहेत. याबाबत गावोगावच्या ग्रामपचायतींनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.