पेशावर – पाकिस्तानच्या वायव्येकडील भागामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 145 जण जखमी झाले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाल्यामुळे ही जीवितहानी झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खैपर पख्तुन्वा प्रांतातील बान्नू, लक्की मरवात आणि कराक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि गारपिटीने झोडपले असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागांमधील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत आणि विजेचे खांबदेखील कोसळले आहेत. अतिवृष्टीमुळे जखमी झालेल्यांना आपत्कालीन मदत पोचवण्याचे काम केले जाते आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या दिशेने घोंघावत असलेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि भीषण पुरामुळे पाकिस्तानमध्ये किमान 1,700 जणांचा मृत्यू झाला होता. तर पुरामुळे 3 कोटी 30 लाख नागरिक प्रभावित झाले होते. पुरामुळे 80 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 1.3 अब्ज रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.
खैबर पख्तुन्वा प्रांतामध्ये आणीबाणी
अतिवृष्टीमुळे खैबर पख्तुन्वा प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. बन्नू, लक्की मरवात आणि कराक या चार जिल्ह्यांमध्ये ही आणीबाणी लागू करण्यात आली आहे. घरांचे छत कोसळल्यामुळे आणि भिंती कोसळल्यामुळे किमान 12 जण जिवंत गाडले गेले आहेत. यामध्ये 8 लहान मुलांचा समावेश आहे, असे प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते तैमूर अली खान यांनी सांगितले. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे आणखीन नुकसान होण्याची शक्यता असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.