- परप्रांतियांचे पोलिसांकडे अर्ज
- जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला प्रस्ताव
पिंपरी – शहरात अडकून पडलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या गावी पाठविण्याच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. शहरात खूप मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. यापैकी अनेकांनी पोलिसांकडे घरी परत जाण्यासाठी अर्ज केला आहे. परप्रांतियांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी 24 रेल्वे गाड्यांची गरज भासणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 24 रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद पडले आहेत. हाताला काम नाही त्यामुळे खायचे काय, असा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे. या मागणीसाठी हिंजवडीतील बांधकाम मजूर दोनवेळा रस्त्यावर उतरले होते. तसेच इतर क्षेत्रातीलही अनेक कामगार आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी जोरदार मागणी होताना दिसत आहे. त्यातच काही मजूर पायी गावाकडे जायला निघाले आहेत. अशा मजुरांना महापालिकेने सुरू केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांचा धीर आता सुटत चालला आहे.
43 हजारांहून अधिक अर्ज
ज्या मजुरांना गावी जायचे आहे, त्यांनी आपली नोंदणी जवळच्या पोलीस ठाण्यात करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यानुसार 4 मे पासून पोलीस ठाण्यांमध्ये माहिती घेण्यास सुरवात झाली आहे. एकट्या सायबर विभागाकडे दररोज पाच ते सहा हजार अर्ज येत आहेत. आत्तापर्यंत या विभागाकडे जवळपास 43 हजार अर्ज जमा झाले आहेत. आलेल्या माहिती परिमंडळ एक आणि दोन कडून एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक राज्य आणि शहरानुसार माहिती संकलित करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. प्रत्येक रेल्वे गाडीत एक हजार 300 जणांची जाण्याची सोय करण्यात येत आहे. त्यानुसार 24 रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून जिल्हाकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. प्रत्येक परिमंडळ कार्यालयासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित राज्यांकडे ही यादी मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्या राज्यांकडून मंजुरी आल्यावर या रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव रेल्वेकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वे या प्रवाशांना नेण्याची तारीख आणि वेळ पोलिसांना कळविणार आहे.
राज्यनिहाय रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव
उत्तर प्रदेश – 13
बिहार – 8
झारखंड – 2
राजस्थान – 1