कोपरगाव – तालुक्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
त्यावेळी शासनाकडून प्राथमिक स्वरूपातील मदत म्हणून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 8.28 कोटीची मदत मिळाली आहे व दुसऱ्या टप्प्यातील 19.67 कोटी रुपयांची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुका कायमच दुष्काळाच्या झळा सोसत आहे. यावर्षी सुरुवातीला पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पीक उभे केले होते. मात्र ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा कोपरगाव तालुक्यातील शेतीला बसल्यामुळे काढणीला आलेल्या बाजरी, मका, कापूस, सोयाबीन आदी पिकांसह चारा पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. येणाऱ्या रब्बी हंगामात शेतात पीक कसे उभे करायचे या विवंचनेत शेतकरी पडला होता.
त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केल्यामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होवून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला होता.
सरकार स्थापन होताच शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना अजून मदत मिळावी यासाठी मागणी करणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली होती.
त्याप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पहिली मदत 8.28 कोटी व आता देण्यात येणारी 19.67 कोटी रुपयांची मदत मिळून एकून 27.95 कोटी रुपयांची मदत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीतून बॅंकेला कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करणार नाही असे आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.