नवी दिल्ली – मध्य आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनियामध्ये भारताच्या 16 खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. (16 Sailors Detained In Equatorial Guinea) या खलाशांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
एमटी हिरोइक इडून या जहाजावरील कर्मचाऱ्यांना आणि भारतीय खलाशांना ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून इक्वेटोरियल गिनियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती राज्यसभेतील खासदार ए.ए.रहिम यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पाठवलेल्या पत्रामध्ये दिली आहे.
या भारतीय खलाशांच्या सुटकेसाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही रहिम यांनी जयशंकर यांना केली आहे. ताब्यात घेतल्या गेलेल्या भारतीय खलाशांशी भारतीय दूतावासाचा फोनवरून सतत संपर्क असल्याचे दूतावासाच्या वतीने सांगण्यात आले आहे.