भेंडा – नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.3 मे रोजी 190 दिवसांत 15 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून गाळपातील नवा उच्चांक प्रस्थापित केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.
सन 2017-18 मध्ये 6000 वरून प्रतिदिन 7000 मेट्रिक टन गाळप क्षमतेची विस्तारवाढ करण्यात आली होती. ऊस गाळप व साखर उत्पादनाबरोबरच पूरक उद्योग ही सुरू करण्यात आले. त्यात प्रतिदिन 45 हजार लिटर उत्पादन क्षमतेची डिस्टिलरी, 50 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प, 31.5 मेगावॉट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प इत्यादी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. हे सर्व पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्याने दि. 3 मे अखेर 15 लाख 600 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 13 लाख 18 हजार 500 क्विंटल पक्की साखर व 1 लाख 48 हजार 250 क्विंटल कच्ची (रॉ)साखर निर्मिती केली आहे.
वीज निर्मिती व निर्यात
या हंगामात दि.2 मे अखेर 12 मेगावॉट व 19.5 मेगावॉट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून 10 कोटी 29 लाख 23 हजार 133 युनिट वीज निर्मिती करून 6 कोटी 29 लाख 24 हजार 440 युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे.
अल्कोहोल व इथेनॉल निर्मिती
दि.2 मे अखेर 45 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या डिस्टिलरीमधून 89 लाख 10 हजार लिटर अल्कोहोल निर्मिती झाली.तसेच 50 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पातून 75 लाख 36 हजार 883 लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे. 15 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप कारखाना स्थापने पासून हे सर्वात उच्चांकी गाळप आहे.
या नवीन उच्चांकाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ऍड.देसाई देशमुख, तज्ज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील, कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरकुटे, एस.डी.चौधरी, चीफ इंजिनिअर राहुल पाटील, शेतकी अधिकारी सुरेश आहेर यांचेसह कारखान्याचे अधिकारी, इंजिनिअर्स व सर्व कामगार, ऊस तोडणी व वाहतूक मजुरांचे अभिनंदन केले आहे.