सातारा -एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दिलेल्या मुदतीत 22 एप्रिलपर्यत जिल्ह्यातील 11 आगारातील 98 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. संपकाळात केवळ दीडशे एसटी बसेस कार्यरत होत्या. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील 11 डेपोत 400 जादा बस संचलनात आल्या असून सद्यस्थितीत एकूण 550 बसेसच्या दिवसाला सरासरी दीड हजारांहून अधिक फेऱ्या सुरु आहेत. जिल्ह्यांतर्गत व लांब पल्यांच्या बसेसची संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या साडेपाच महिन्यांपासून संप पुकारला होता. या संपातून तोडगा काढत कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ केल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही संघटनांनी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम राहत आंदोलन सुरुच ठेवले होते. यावर न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. बडतर्फ कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात सक्त ताकीद देऊन हजर होण्यास सांगितले.
त्यामुळे जिल्ह्यातील 11 डेपोतील 98 टक्के म्हणजे तीन हजार 285 कर्मचारी हजर झाले. गैरहजर असणारे 150 कर्मचारीही आठवडाभरात हजर होणार आहेत. कामावर हजर होताना एसटी प्रशासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणीचे पत्र सादर केल्यावर हजर करुन घेतले. आता जिल्ह्यातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. सद्यस्थितीत परीक्षांचा कालावधी व पर्यटनाचा हंगाम सुरु होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या लालपरीसह इतर ठिकाणी शिवशाही, हिरकणी या बसेसही जिल्ह्यातील विविध डेपोतून सुरु झाल्या आहेत. ग्रामीण भागात फेऱ्यांची संख्या वाढल्याने नागरिकांची गैरसौय दूर झाली आहे.
शंभरहून अधिक बसेसच्या बॅटऱ्या खराब
जिल्ह्यातील 11 डेपोत एकूण 700 बसेस असून मागील सहा महिन्यापासूनच्या संपामुळे बहुतांश बस डेपोतच उभ्या होत्या. त्यामुळे बॅटऱ्या, टायर व इंजिनमधील ऑईल खराब झाले आहे. संप मिटल्याने बंद बसेस आता संचलनात आणल्या आहेत. यामधील 110 बसेसच्या बॅटऱ्या खराब झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे अनेक बसेसची आरटीओ तपासणी करुन परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरु आहे.