मुंबई – शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन गट निर्माण झाले आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार गटातील नेतेमंडळींनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यातच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्वीट केले आहे.
पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज…शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी, आणि राजकारणात संयमाला किती महत्त्व आहे हे कोणाकडून शिकावं? एकच नाव शरद पवार. कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही समजत नाही. १०-१५ दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यातच आता बंडाला १५ दिवस झाल्याने हे ट्वीट आव्हाडांनी केल्यामुळे आता पुन्हा राजकारणात काय घडणार हे पाहवे लागणार आहे.
पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज… शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी आणि राजकारणात संयमाला किती महत्व आहे हे कोणाकडून शिकावं; एकच नाव शरद पवार !
कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही. 10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2023
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी रविवारी दुपारी वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आमदारांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेही उपस्थित होते. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठी येथे आलो असल्याचे सांगितले.