पुरंदर – नैसर्गिक संकटांसह शेतकऱ्यांना कृत्रिम संकटांचाही मोठा सामना करावा लागत आहे. अनेकदा दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपीकांचे नुकसान होत असते. वर्षानुवर्षे शेतकरी कर्जबाजारी पणात घालवतात. त्यातच एखाद्या वर्षी निसर्गाने साथ देऊन पीक चांगले आले तर सरकारच्या धोरणांमुळे तो संकटात सापडत आहे. गेल्या आठवड्यात पाच क्विंटल कांद्याला दोन रुपये मिळाल्याची घटना ताजी असतानाच आता पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याला 100 किलो वांग्याचे केवळ 66 रुपये मिळाल्याची घटना समोर आली आहे.
नाना तिवटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पुरंदर तालुक्यातील कुभार वळण येथिल आहेत. त्यांनी त्यांचे वांगे विक्रीसाठी पुण्यातील मार्केट यार्डामध्ये आणले होते. तिथे त्यांना कवडीमोलाचा भाव मिळाला. या प्रकारानंतर शेतकरी वर्गातून संतापाची भावणा उमटत आहे. काही शेतकऱ्यांनी वांगी पीकावार आता नांगर फिरवला आहे. अनेकांनी वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे.
नाना तिवटे यांनी शेतामध्ये 11 गुंठ्यांमध्ये वांग्याचे पीक लावले होते. वांग्याला चांगला बाजारभाव मिळेल या हेतूने त्यांनी चांगली खते आणि औषधे वापरून पीकही चांगल्या पद्धतीने वाढवले होते. 100 किलो वांग्याचे पीक आले, त्यामुळे ते विक्रीसाठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आणण्यात आले होते. मात्र त्या पिकाला योग्य बाजारभावच मिळाला नाही. तीन महिने मेहनत करून 100 किलो वांग्याना फक्त 66 रुपये मिळाले आहेत. तिवटे यांनी काढलेल्या वांग्याच्या उत्पादनाच्या काढणीचाही खर्च या पैशातून निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील अनेक वांगी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगा आम्ही जगायचं कसं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आज देशात सर्वच वस्तूंच्या किंमती ठरलेल्या आहेत. मात्र शेतकऱ्याच्या मालाला ठरलेली रक्कम नाही. ज्यावेळी उत्पादन कमी होते तेंव्हा किंमती वाढतात. आणि ज्यावेळी उत्पादन वाढते त्यावेळी किंमती कमी होतात. म्हणजे शेतकऱ्यांना दोन्ही वेळी फायदा होत नाही. शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्याच्या मालाला योग्य किंमत द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत.