कोलकाता – भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याच्यावर सध्या जी टीका सुरू आहे ती योग्यच आहे, असे मत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे. जर सामना भारतात म्हणजेच मायदेशात होत असेल तर त्यात तुम्हाला धावा करता आल्या नाहीत किंवा मोठी खेळी करता आली नाही तर टीका होणारच. मायदेशात धावा करणार नसाल तर मग कुठे करणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
केवळ राहुलच नव्हे तर आजवर इतिहासातही डोकावून पाहिले तर लक्षात येते की अनेक स्टार फलंदाजांना जेव्हा मायदेशात धावा करता आल्या नाहीत तेव्हा त्यांच्यावरही टीका झाली आहे. भारतीय क्रिकेटपटूंबाबत तर हे जास्त दिसते कारण मैदानावर हजारो प्रक्षेक तुमची खेळी पाहण्यासाठी येत असतात व त्यांना निराश केले तर तेच नव्हे तर समालोचक, माजी खेळाडूही निराश होतात व त्यातूनच ही टीका होते. राहुल चांगला फलंदाज आहे, मात्र, त्याचा कसोटी क्रिकेटवरचा फोकस कुठेतरी हरवल्यासारखे दिसत आहे. त्याने यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहीजे अन्यथा निवड समिती कठोर निर्णय घेइल, असा सल्लाही गांगुली यांनी दिला आहे.
संघ व्यवस्थापन व कर्णधार राहुलला जास्तीत जास्त संधी देत आहे मात्र, त्याचे अपयश जर असेच राहिले तर त्याचे संघातील स्थानही धोक्यात येऊ शकते. प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्या मते तो संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे त्यामुळेच ते त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत परंतू यामुळेच नवोदितांनाही डावलेल जात आहे. असे होऊ नये, संघातील नवोदितांना संधी मिळालीच पाहीजे, त्यासाठी कठोर निर्णय घेतले गेले पाहीजेत, असेही गांगुली म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचा हा संघ दुय्यमच
भारताच्या दौऱ्यावर यंदा आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ दुय्यमच वाटत आहे. त्यांची होमवर्कही केल्याचे दिसत नाही. त्यांच्या यापूर्वीच्या संघाची यंदाच्या संघाशी तुलना केली तर लगेच लक्षात येते की त्यांनी सरावही फारसा गांभीर्याने केलेला नाही. भारतीय वातावरणात व खेळपट्टयांवर खेळण्यासाठी जो संयम आवश्यक असतो तोच त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी दाखवलेला नाही. त्यामुळेच ही मालिका त्यांच्यासाठी अपयशी ठरत आहे, असा टोलाही गांगुली यांनी लगावला आहे.