सातारा -खटाव तालुक्यातील एका महिलेची प्रसुती करण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या डॉक्टरांकडूनच अहवाल मागवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी या प्रकरणातील संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करत उपाध्यक्ष प्रदीप विधातेंसह सदस्यांनी या अहवालाचा भांडाफोड केला. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. फेरचौकशीसाठी त्रिसदस्यीस समिती गठित करुन 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिले.
जिल्हा परिषदेची सभा शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. सभेस अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व अविनाश फडतरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्यासह खातेप्रमुख, सदस्य उपस्थित होते.
उपाध्यक्ष विधाते यांनी खटाव तालुक्यातील महिलेची प्रसुती करण्यास टाळाटाळ करणारे खासगी डॉ. कुंभार, वडूज ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. माने, डॉ. मदने यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी काय कारवाई केली, अशी विचारणा केली. ग्रामीण रुग्णालयाचे माने यांच्याकडून अहवाल घेतला असून ग्रामीण रुग्णालयाचा यामध्ये दोष नसल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले. गडीकरांच्या या उत्तराने विधाते यांच्यासह सदस्य आक्रमक झाले. ज्या डॉक्टरांवर आरोप आहेत त्यांच्याकडूनच अहवाल मागवण्यात येत असेल तर ही बाब गंभीर आहे.
खासगी डॉ. कुंभार यांच्याकडे एका महिलेची प्रसुतीसाठी नोंदणी असतानाही तिला दाखल करुन घेण्यात आले नाही. ग्रामीण रुग्णालयातही तिला दाखल करुन घेतले जात नाही. एवढेच नव्हे तर त्या महिलेला वाहनही उपलब्ध करुन देण्यात आले नाही. ही बाब गंभीर असतानाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने प्रदीप विधाते, भीमरावकाका पाटील, धैर्यशील अनपट, शिवाजी सर्वगौड आदी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
जिल्हा परिषदेने समिती नेमून फेरचौकशीची मागणी करण्यात आली. विधाते म्हणाले, “जिल्हावासियांची मान शरमेने खाली जाईल असे कृत्य वैद्यकीय क्षेत्रातील काही लोकांकडून झालेले असतानाही त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याकडूनच अहवाल मागवून सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला ही बाब खेदजनक आहे.’ संबंधित शासकीय डॉक्टर आणि खासगी डॉक्टर यांचा याप्रकरणात निष्काळजीपणा असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येत असून यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील एक सदस्य, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य यांचा सहभाग असणार आहे. 15 दिवसांत याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश उदय कबुले आणि संजय भागवत यांनी दिले.