मांढरदेव – महाराष्ट्र व इतर राज्यांमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी, ता. वाई येथील श्री काळूबाईची यात्रा उद्या, दि. 28 पासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व अन्य राज्यांमधून लाखो भाविक मांढरगडावर येतात; परंतु करोनामुळे यंदाची यात्रा रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पौष महिन्यात, म्हणजे 14 फेब्रुवारीपर्यंत काळूबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले असून तेथे गर्दी होऊ नये, याची दक्षता पोलीस व प्रशासन घेत आहे. देवीची विधिवत पूजा व महाआरती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस उद्या (गुरुवार, दि. 28) असून देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या हस्ते सकाळी 6 वाजता देवीची विधिवत पूजा होणार आहे. देवस्थानचे चेअरमन व न्यायाधीश एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त व जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, देवस्थानचे सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित राहणार आहेत.
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळूबाई मंदिर परिसरात भाविकांना प्रवेश बंदी असून तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाई येथे एमआयडीसी चौकात, भोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ व कोचळेवाडी फाटा येथे मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मांढरगडाकडे निघालेल्या भाविकांची वाहने तेथूनच माघारी पाठवली जात आहेत. भाविकांना कोणत्याही परिस्थितीत मंदिराकडे सोडले जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पौष महिन्यात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मांढरगडावर लाखो भाविक येतात. विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स मंदिर परिसरात थाटली जातात; परंतु यंदा बाहेरील कोणालाही मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.