पुणे – पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात स्वतंत्रपणे शैक्षणिक चॅनेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्यामुळे लवकरच शिक्षण विभागातर्फे अधिकृतरित्या शैक्षणिक चॅनेल सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. गायकवाड यांनी ही घोषणा केली. करोनाचे संकट आले असले त्यातून संधी म्हणून आता ऑनलाइन, यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शैक्षणिक चॅनेल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगत गायकवाड यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
बालचित्रवाणी पुनरूज्जीवित करणार
बालचित्रवाणीमधील स्टुडिओ वापराविना पडून आहेत. ते सर्व साहित्य अद्ययावत करीत त्याचा उपयोग शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यासाठी केला जाणार आहे. अभ्यासक्रमातील लेखक, कवी यांचेही मार्गदर्शन या माध्यमातून होणे आवश्यक आहे. त्याचा विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर अधिक ज्ञान आत्मसात करता येणे शक्य होणार असल्याची माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
शाळाबाह्य मुलांसाठी विशेष मोहीम
करोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. आता सर्व शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. यापूर्वीच नववी ते बारावीच्या शाळा, आता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. विशेषत: जी मुले शाळा व शिक्षणापासून वंचित राहिले आहेत, अशा मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी आणि शाळेत उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शाळाबाह्य मुले विशेषत: त्यातील मुली शाळेत कसा आणता येईल, यावर मोहिमेचे मुख्य काम राहील. त्यासाठी ऍपही सुरू करण्यात येणार असल्याचे प्रा. गायकवाड यांनी म्हटले आहे.