शिरवळ – करोनाच्या काळात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणे शिरवळच्या युवकांना महागात पडले आहे. लॉकडाऊनमध्ये जमावबंदी असताना शिरवळ येथील दोन युवकांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 50 जणांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, शिरवळ परिसरातील दोन युवकांचे वाढदिवस गेल्या महिन्यात वेगेवेगळ्या तारखांना साजरे झाले होते. मुजम्मिल रमजान उर्फ मुन्ना गणीभाई शेख (रा. आझाद गल्ली, शिरवळ) याने काचकी नावाच्या शिवारात वसीम खान यांच्या शेळी फार्मवर 13 जूनला सायंकाळी सातच्या सुमारास 25 ते 30 मित्रांना जमवून केक कापून व जेवण देऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता. त्यातील एकाला करोनाची बाधा
झाल्याचे 27 जूनला निष्पन्न झाले. त्याच्याकडे संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी विचारपूस करण्यात आल्यावर त्याने वाढदिवसाची पार्टी दिल्याचे उघड झाले. आझाद गल्लीतीलच रज्जाक उर्फ बबलू अनिस खान यानेही 20 जूनला रात्री साडेनऊ वाजता आपल्या घरासमोर 20 ते 25 मित्रांना जमवून वाढदिवस साजरा केला. त्यानेही केक कापून मित्रांना जेवण दिले होते.
या पार्ट्या झाल्यानंतरच करोनाबाधित रुग्ण आढळल्याने आणि 30 जूनपर्यंत संचारबंदीत कोणत्याही कारणास्तव पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असताना, आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन्ही बर्थडे बॉइज्सह 50 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करत आहेत.
ग्रामीण भागात वेगाने संसर्ग
खंडाळा तालुक्यात करोनाचा संक्रमणाची साखळी खंडित करणे आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली असून खंडाळा, शिरवळसारखी प्रमुख शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
एकट्या शिरवळमध्ये बाधितांची संख्या 84 झाली असून संपूर्ण तालुक्यात एकूण 140 रुग्ण आहेत. औद्योगिक कंपन्यामधील कामगारांना करोनाची बाधा अधिक होत असून त्याचा संसर्ग ग्रामीण भागात गतीने होत आहे.