नवी दिल्ली: सध्या देशभर करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावर गर्दी करून आंदोलने करण्यास अनुमती नाही. या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागात आपल्या मागण्यांकडे सरकारचे आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकांनी आंदोलनांचे नवीन मार्ग शोधून काढले आहेत. त्यानुसार काही जणांनी घरातच बसून तीन-तीन दिवसांचे उपोषण केले, काहींनी टेरेसवर जमून निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू केली आहे तर काहींनी ऑन लाईन पद्धतीने आपले आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात राजस्तानातील कोटा या शैक्षणिक केंद्रात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासी इमारतींच्या टेरेसवर जमून आंदोलने केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी विविध राज्यांतून बसेस धाडण्यात आल्या होत्या. जम्मू काश्मरातील 1200 कामगारांना पंजाबातील पठाणकोट येथे चौदा दिवसांच्या क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. त्याची मुदत संपल्यानंतरही त्यांची सुटका न झाल्याने त्यांनी आपल्या निवासस्थानीच तीन दिवसांचे उपोषण करून आंदोलन केले. दिल्लीच्या जवाहरला नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी नेहमीच आंदोलने करीत असतात. पण सध्याच्या लॉकडाऊन स्थितीमुळे त्यांनी ऑन लाईन पद्धतीने आंदोलन करण्याचा मार्ग अनुसरला. त्यांनाहीं त्यांच्या गावी जायचे आहे. त्यासाठी सोय करावी अशी त्यांची मागणी आहे. तथापी अशाही अवस्थेत त्यांच्यावर पोलिसांची दडपशाही सुरूच आहे अशी तक्रार तेथील विद्यार्थीै संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी केली आहे.
राजकीय नेतेही आता काही ठिकाणी असा मार्ग अनुसरू लागले आहेत. करोना लॉकडाऊन मुळे ज्या मजुरांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना सरकारने पाच हजार रूपयांची मदत करावी या मागणीसाठी तेलगु देसम पक्षाचे आमदार गद्दे राममोहन आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी घरातच बसून बारा तासांचे उपोषण केले. केंद्र सरकारकडून निधी वाटपाबाबत पंजाबवर अन्याय होत असल्याची तक्रार करीत पंजाबातील कॉंग्रेस नेत्यांनी इमारतीच्या गच्चीवर निदर्शने केली. शाळेची फी वाढ, कर्मचाऱ्यांचा पगार न देणे, घरमालकांनी जबरदस्तीने भाडे वसुल करणे इत्यादी बाबींच्या विरोधात आता ऑनलाईन पिटीशनचीही नवी चळवळ देशात उभी राहात असल्याचे ठिकठिकाणी आढळून आले आहे.