माणूस एकदा संसारात, व्यवसायात स्थिरस्थावर झाला की त्याला आपल्या पूर्वायुष्यातील घटना, मित्र, मैत्रिणी यांची आठवण होते. विशेषत: नोकरी/व्यवसायातून निवृत्त झाल्यावर तर अशा आठवणी तीव्रतेनं होतात. एक तर माणसाला थोडा-फार मोकळा वेळ उपलब्ध झालेला असतो, फारशा जबाबदाऱ्या नसतात आणि मुख्य म्हणजे पूर्वायुष्यात मित्र आणि सहकाऱ्यांबरोबर झालेले मतभेद, भांडणं थंड झालेली असतात. याशिवाय ते सगळे कुठे असतात, काय करतात, कसे दिसतात याविषयी कुतूहल असतं. यामुळे व्यक्ती पुनर्भेटीसाठी-रियुनियनसाठी उत्सुक असतात.
अलीकडील काळात करोनामुळे जो एकाकीपणा भोगावा लागला तो नाहीसा होताच रियुनियन व्हावं असं लोकांना तीव्रतेनं वाटू लागलं. “मॅन इज अ सोशल ऍनिमल’ असं म्हटलं जातं. मनुष्य जर “सोशल’ म्हणजे मिसळून राहणारा नसेल तर तो नुसता “ऍनिमल’ म्हणजे पशूसमान होय. साथरोगाच्या कारणानं तो इतरांशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकत नव्हता. मात्र रोगाच्या भीतीपासून मुक्त होताच त्याचं हे समाजप्रेम अधिक जोरात उचंबळून आलं. म्हणूनच गेल्या वर्षात आपण संमेलनांचा/समारंभांचा वर्षाव पाहत आहोत. माणूस हा उत्सवप्रिय आहे असं म्हटलं जातं ते खरंच आहे.
पूर्वी लोकसंख्या कमी होती आणि देशात सुबत्ताही होती. पीक-पाणी झालं की त्यानंतर आपल्याकडे सणांची रीघच लागायची, ती पुन्हा शेतकऱ्याला जमिनीकडे लक्ष देणं भाग पडेपर्यंत. यात भरीस भर म्हणून लग्नाचा सीझन आला की पुन्हा भेटी-गाठी सुरू. या भेटी-गाठी म्हणजे एक प्रकारचे “सोशल कॉंटॅक्टिंग’च होतं. आणि प्रत्यक्ष लग्न किंवा मुंज समारंभ म्हणजे तर एक प्रकारचं रियुनियनच! अशा समारंभात विशेषकरून स्त्रियांना मिरवायला खूप आवडतं असं म्हटलं जातं. त्यालाही कारण आहे. घरात बसून काम करून त्यांना शेजारणींशिवाय फारसा सामाजिक सहवास मिळायचा नाही. अशी संधी त्यांना लग्न-मुंजीच्या समारंभात मिळायची. थोडीफार सणांमधूनही मिळायची.
शाळा-कॉलेजांमधून स्नेहसंमेलनं होतात. परंतु बारकाईनं पाहिलं तर त्यात काय असतं? तर एखादं नाटक, एखादा सिनेमा, विविधगुणदर्शन आणि स्नेहभोजन. यामध्ये सर्वांना मिळून-मिसळून भेटता बोलता येईल असं फारसं घडत नाही. शिवाय संमेलन संपलं की पुन्हा अभ्यास, क्लास, एखादी ट्रिप की संपलं. व्यक्तीची सामाजिक भूक यांनी शमत नाही. नोकरीच्या ठिकाणीही संमेलनं, एखादा कॉश्च्यूम डे, डान्स फेस्टिव्हल असं असतंच पण तेही बहुतांश काहींनी करायचं आणि इतरांनी बघायचं अशाच स्वरूपाचं असतं. वेळेचंही बंधन असतं.
काही कंपन्या आपल्या विक्रेत्यांबरोबर सहली, संमेलनं आयोजित करतात. तीही एक प्रकारची रियुनियनच असते. विक्रेत्यांची आणि कंपनीतील अधिकाऱ्यांची ओळख असते परंतु ती फोन किंवा ईमेल द्वारे असते. प्रत्यक्ष गाठभेट क्वचितच होते. एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अशी समोरासमोर भेट आवश्यक ठरते. असाच प्रकार अनेक औषध कंपन्या डॉक्टर मंडळींच्या समूहाबरोबर घडवून आणतात. कंपन्या आयोजित करीत असलेलं रियुनियन साधारणपणे दूरवरच्या-कधी कधी परदेशी सुद्धा-प्रदेशात ठेवल्या जातात. हेतू हा की उपस्थितांवर कुठल्याही प्रकारचा ताण नसावा. अर्थात कंपन्या आयोजित करीत असलेलं रियुनियन आणि माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी किंवा निवृत्त कर्मचारी यांचं रियुनियन यांच्यात एक मोठा फरक आहे.
तो म्हणजे कंपन्यांचं रियुनियनवजा संमेलन हे विशिष्ट व्यावसायिक हेतूनं केलेलं असतं तर माजी विद्यार्थी किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांचं रियुनियन हे निखळ प्रेमापोटी असतं. कित्येकदा नेहमी फोनवर भेटत असलेल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा होते. हॉटेलात काही तास भेटून ही पुनर्भेटीची-प्रत्यक्ष भेटीची-भूक भागत नाही. अशा परिस्थितीत “नाइट-आउट’ ही संकल्पना उपयोगी पडते. नाइट-आउटमध्ये मित्र किंवा मैत्रिणी संपूर्ण रात्र एका मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे घालवतात. एकत्र जेवण-खाण, गप्पा, आपले अनुभव शेअर करतात, सहवासाचा आनंद लुटतात. हेही एक अल्पकालीन रियुनियन आहे.
नुकताच “प्रभात’ वृत्तपत्रानं 92वा वर्धापनदिन साजरा केला. तिथे राजकारणी, कला क्षेत्रातील व्यक्ती, लेखक, वार्ताहर, संपादक, जाहिरातदार, वर्गणीदार, हितचिंतक या सर्वांना समोरासमोर भेटता-बोलता आलं. व्यापक अर्थानं हेही एक रियुनियनच होतं.
– श्रीनिवास शारंगपाणी