मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बांधलेले भक्तनिवास सोमवारपासून (दि. 12) सुरू करण्यात येणार आहे. पर्यटक आणि भाविकांनी भक्तनिवासात वास्तव्य करुन येथील निसर्ग सौदर्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यु काळे यांनी केले.
बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातून लाखो भक्त, पर्यटक निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाविकांच्या सोयीसाठी राजपूर येथे पाच एकर क्षेत्रात प्रशस्त भक्तनिवास उभारण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचे बांधकाम व 1 कोटी 80 लाख रुपये फर्निचरसाठी खर्च करण्यात आले आहे. भक्तनिवासाच्या इमारतींमध्ये पहिला, दुसरा व तळमजला मिळून 90 खोल्या आहेत. यापैकी 81 खोल्या, लोकनिवास 4, सभागृह 2, उपहारगृह 1 व वाहनतळ इत्यादी सुविधा येणाऱ्या भाविक व पर्यटकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. भक्त निवासाचे आरक्षण करावयाचे असल्यास महामंडळाच्या संकेत स्थळावर जाऊन नोंद करावी किंवा भक्तनिवास येथे संपर्क साधावा, असे महामंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापिका क्षीप्रा बोरा यांनी सांगितले.