ग्रामीण रूग्णालयात दररोज दीडशे रग्ण दाखल
यवत- वातावणातील विचित्र बदलामुळे साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. कावीळ, फ्लू, गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या, ताप, थंडी, खोकला, पोटदुखी अशा प्रकारच्या आजाराने डोके वर काढले आहे. साथीच्या आजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे.
पावसाळ्यातील साथीच्या आजाराच्या प्रमाणात वाढ होत असताना संसर्गाचा धोका वाढत आहे. यवत येथील ग्रामीण रुग्णालयात रोज दीडशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी सकस आहार व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला यवत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिला आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूंची वाढ होते. यामुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घशाची खवखव आदी आजार बळावत आहेत.
नियमित व सकस आहार, पुरेशी विश्रांती घ्यावी. उकळून गार केलेले पाणी भरपूर प्यावे, श्यक्यतो बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. जास्तीचा ताप आल्यास त्वरीत सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी केले आहे.