- चार वर्षात 387 पिस्तूल हस्तगत; पोलिसांच्या कारवाईला उतरती कळा
पिंपरी – पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीला 110 दिवसाच्या कालावधीत 113 पिस्तूल पकडणारे पोलीस सध्या सुस्तावले आहेत. गेल्या दोन वर्षात अवघी 117 पिस्तूल पकडल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी आहे. गेल्या चार वर्षात 387 पिस्तूल पोलिसांनी पकडले आहेत. मात्र पोलिसांच्या कारवाईला उतरती कळा लागली आहे. यामुळे शहरात पिस्तूल येत नाही की पोलीस पाहत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर आपले स्थान कायम ठेवण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्यात जणू चुरसच लागली होती. आयुक्तालय सुरु होऊन 110 दिवसांत पोलिसांनी तब्बल 113 पिस्तूल पकडत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आता मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भीतीने गुन्हेगारांनी शहरात पिस्तूल आणणे थांबविले आहे की पोलिसांनी गुन्हेगारांना पाहून डोळे झाकले आहेत? असा प्रश्न निर्माण होतो. ज्या पद्धतीने शहरात गुन्हेगारी वाढली आहे, ते पाहता पोलिसांची कामगिरी अगदीच थंडावली असल्याचे दिसत आहे. महिन्याला दोन किंव तीन पिस्तूल पोलीस पकडत आहेत. जर खरोखरीच पिस्तूल आणणे थांबले असेल, तर आनंदाची बाब आहे, परंतु दुर्लक्ष होत असेल तर मात्र शहरातील नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे.
यापूर्वी झालाय पिस्तूलचा खुलेआम वापर
कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. सराईत गुन्हेगार संतोष कुरवत याच्यावरही गोळीबार करीत खूनी हल्ला करण्यात आला आहे. पिंपळे गुरव येथे एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. रावण गॅंगचा म्होरक्या अनिकेत जाधव याचाही गोळ्या घालून खून करण्यात आला होता. सराईत गुन्हेगार जयंत चितळकर याच्याशी झालेल्या झटापटीत त्याच्याकडील पिस्तूलमधील गोळी लागून तो जखमी झाला होता. गुन्हेगारी क्षेत्रात गावठी कट्ट्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे झोपडपट्टीतील चिल्लर भाई “पिस्तूलवाला दादा’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
कोठून येतात शहरात पिस्तूल
सध्या शहरात बिहार, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आदी भागातून पिस्तूल येतात. स्थानिक गुन्हेगार त्या ठिकाणी जाऊन पिस्तूल खरेदी करतात. तसेच उद्योगनगरीत येणारे ट्रक चालकही पिस्तूल विक्री करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून धुळे आणि जळगाव येथील बॉर्डरवरील परिसरातून पिस्तूलाची आवक होताना दिसते. या पिस्तूलांची जागेवर विक्री किंमत 10 ते 15 हजार रुपये असते. मात्र शहरात ती 40 हजार रुपयांपर्यंत विक्री केली जाते. जर खरेदी करणारा श्रीमंत असेल तर तेच पिस्तूल 70 हजारापर्यंत विक्री केली जाते.
अशी होते विक्री
पिस्तूल विक्री करणारे दलाल बॅंकेचा खाते क्रमांक देऊन त्यात पैसे टाकायला लावतात. पिस्तूल नेण्यासाठी ठराविक जागा सांगितली जाते. जागा निवडतानाही ती उंचीवरील ठरविली जाते. यामुळे खरेदी करणारी व्यक्ती तीच आहे का, तसेच तिच्यामागे आणखी कोणी पाठलाग करीत येत आहे का, हे उंचावरून लांबूनच दिसते. यामुळे गुन्हेगाराचा पिस्तूल देतानाचा संभाव्य धोका टळतो.