आमदार कुल घेणार अधिकाऱ्यांची बैठक; जपून वापराचे आवाहन
दौंड- खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर तालुक्याकरिता पिण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आले असले तरी याद्वारे साठवणूक करण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करून ते शहर तसेच उपनगरांसाठी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. ज्या गावांचा पाणी पुरवठा कालव्यालगतच्या विहिरींवर अवलंबून आहे, त्यांनाही पाणी जपून वापरण्याबाबत आवाहन करण्यात आल्या आहेत. यासर्व स्थितीवर आमदार राहुल कुल स्वत: लक्ष ठेऊन आहेत. याकरिता संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्याचे पाणी नियोजनही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पुणे शहराकरिताच्या पीण्याच्या पाण्याकरिताच्या राजकारणातूनही पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून खडकावासलातून दौंड आणि इंदापुरकरिता आवर्तन सोडण्याकामी आमदार कुल यांना यश आले. दौंड व इंदापूर तालुक्यातून याचे स्वागत झाले. दहा ते बारा दिवस सुरू असलेल्या या आवर्तनामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी काही अंशी वाढली आहे तसेच कालव्यावर आधारित नळ पाणी पुरवठा योजनांनाही यातून नवसंजिवनी मिळाली आहे. परंतु, आवर्तन बंद झाल्याने आता उपलब्ध पाण्याची नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.
याबाबत आमदार ऍड. राहुल कुल म्हणाले की, सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दौंडसाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याची अतिशय बिकट स्थिती निर्माण झालेली असताना पिण्यासाठी पाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वास्तविक पाहता धरणांची निर्मिती ही शेतीच्या पाण्यासाठी झालेली आहे.
शेतीसाठी असणारे धरणांचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करताना विरोध केला गेला नाही. खडकवासला धरणासाठी पिण्याच्या पाण्याबाबत आरक्षित ठेवण्याबाबत जो निकष लावला गेला तोच निकष मुळशी धरणाला लावावा व पुणे शहरासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, म्हणजे जेणेकरून शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा पुढील 10 ते 20 वर्षांचा प्रश्न सुटेल. यासाठी शासनाने गंभीर निर्णय घेणे गरजेचे आहे. आगामी काळात याकरिता आग्रही भूमिका घेणार आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर पुणे शहराला बंद नळीतून पाणीपुरवठा व्हावा, जल शुद्धीकरणाचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करावा आणि संपूर्ण खडकवासला कालव्याची दुरुस्ती करावी, या प्रश्नांबाबत मागील अधिवेशन काळातही लक्षवेधी सुचना मांडून शासनाचे लक्ष वेधलेले असल्याचेही कुल यांनी स्पष्ट केले.
- दौंडच्या हक्काचे पाणी…
खडकवासलातून आवर्तन मिळाले असले तरी हे पाणी दौंडकरांच्या हक्काचे आहे. कारण, धरणांसाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांचे संपूर्ण पुनर्वसन दौंड तालुक्यात झाले आहे. त्यामुळे कायदेशीर हक्क दौंडचाही आहे. परंतु, पाण्याच्या हक्काबाबत जी चर्चा होते, ती दुर्दैवी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी शहरामध्ये एक आणि ग्रामीणमध्ये एक अशी भूमिका मांडणे चुकीचे आहे, असेही आमदार ऍड. कुल यांनी स्पष्ट केले.