शेतकरी हवालदिल : पंधरा-वीस दिवसांपासून भातखाचरे भरलेली
नाणे मावळ- मॉन्सून हंगामात मुसळधार पाऊस सुरू आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसाने जुलै महिन्याच्या अखेरीस आठवड्यात तुफान बॅटिंग केली. दमदार पावसामुळे तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली खरी पण संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक नियोजन धोक्याच्या वळणावर आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला भात रोपांची उगवणीत मोठी अडचण निर्माण झाली. अचानक जोरदार पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांना भात लावण्यासाठी भात रोपचे कोमेजून गेले होते. त्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की भात रोपे असलेल्या शेतकऱ्यांना भात खाचरांमध्ये कोरडी पडली होती. मात्र त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि भात रोपे आठ-दहा दिवस पाण्यात बुडलेली दिसून आली.
सध्या भाताप्रमाणेच मावळातील ऊसाचे पीकही दोन-अडीच फूट पाण्याच्या पातळीत स्वतः चे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकरी कुटुंबातील आर्थिक स्थिती बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अतिवृष्टीमुळे तालुक्यामध्ये शेतीचे नुकसान झालेले आहे, त्याचबरोबर अनेक व्यक्ती जनावरे देखील मृत्युमुखी पडली आहेत. लोकांच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे. तालुक्यातील जनता अडचणीत सापडली आहे. त्यामुळे सर्वांना लवकरात लवकर शासनाने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, आंदर मावळ युवक अध्यक्ष कैलास खांडभोर, नाणे मावळ युवक अध्यक्ष चंद्रशेखर परचंड, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल जाधव, जिल्हा परिषद गट अध्यक्ष दिगंबर अगिवले, बबन ओव्हाळ, शरद गायकवाड, बारकू पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- …म्हणून ऊस पीक ठरतेय “शिकार’
शेतकरी ऊस लागवडीनंतर पिकाची सर्व मशागतीची कामे वेळत करीत असतो. पाऊस सुरू होण्यापूर्वी ऊसाची बांधणी खत टाकून केली जाते. त्यानंतर ऊसाची खऱ्या अर्थाने वाढ होण्यास सुरुवात होत असते. परंतु तोपर्यंत मावळात मुसळधार पावसाला सुरुवात होते. त्यानंतर सुमारे तीन-चार महिने शेतकऱ्यांनी सांभाळलेला ऊस पाण्याखाली जातो. परिणामी ऊसाची वाढ खुंटते. पावसामुळे वाढ खुंटलेल्या ऊसाला मावळातील शेतकरी दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात पुन्हा नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न करतो. उभा राहिलेला ऊस कारखान्याकडून बऱ्याचदा अनेक कारणांमुळे उशिरा तोडला जातो. परिणामी कष्टाच्या मानाने शेतकऱ्यांना एकरी कमी उत्पादन मिळते. उशिरा तोड झाल्याने पुन्हा पुढील हंगामाच्या दृष्टीने विचार करता अनेक शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी तीन-चार महिनेच मिळतात, पर्यायाने योग्य वाढ न झालेला ऊस पावसाची “शिकार’ ठरतो.