- करोनाची भीती : आम्ही नागरिक नाही का ? सफाई कामगारांचा उद्विग्न सवाल
चऱ्होली – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होऊ नये या विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. शिवाय वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवून तोंडाला मास्क बांधावे, अशी जनजागृती करण्यात येत आहे.
तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागातील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. मात्र कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 1400 कामगारांना डावलण्यात आल्याने संतप्त झालेल्या सफाई कामगारांनी आम्ही माणसं नाही का? आमचा जीव महत्वाचा नाही का? असा उद्विग्न सवाल महापालिका प्रशासनाला केला आहे.
महापालिकेच्या सर्व प्रभाग मिळून 1400 सफाई कामगारांची संख्या आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात स्वच्छता करणे, कचरा गोळा करणे, अशा स्वच्छता संबंधित कामे सफाई कामगार करताना दिसतात. मात्र महापालिकेने या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना न करता यांना वाऱ्यावर सोडल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.
दिवसेंदिवस करोनाच्या संख्येत होणारी वाढ व अशा परिस्थितीत सफाई कामगारांचा अन्य व्यक्तींशी येणारा संबंध जीव घेणारा ठरू शकतो. मात्र प्रशासनाने गांभीर्याने विचार न केल्याने सफाई कामगार आपल्या जवळील रुमाल व कापडाने आपले संरक्षण करू पाहत आहेत. हात स्वच्छ करायला सॅनिटायझर नसल्याने करोना सारख्या रोगाच्या भीतीच्या सावटाखाली रोजची कामे सुरू असल्याचे विदारक सत्य आहे.
करोना या आजाराची गंभीर स्थिती लक्षात येताच. या विषयावर आपण स्वतः आयुक्तांशी बोललो. दोन-तीन दिवस जाऊनही या समस्येवर तोडगा न निघाल्याने शेवटी दिघी प्रभागातील 40 सफाई कामगारांना आम्ही वैयक्तिक खर्चातून सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून दिले. प्रशासनाने दाखवलेला हा दुजाभाव योग्य नसून, तात्काळ या समस्येची दखल घेऊन सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा.
– विकास डोळस, नगरसेवक दिघी.