राहुरी, (प्रतिनिधी)- करोनाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटीबध्द असल्याची ग्वाही ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
या महिन्यात वीजमीटर रिडींग घेणेसाठी महावितरणचे संबधित लोक आपणाकडे येवू शकणार नाहीत. ग्राहकांना सरासरी वीजबील आकारणी होईल. याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही. या महिन्याचे वीजबिल भरण्यासाठी मुदतीचा आग्रहा धरला जाणार नाही. वीजबिल उशिरा भरल्यामुळे आकारले जाणारे दंडाची व व्याजाची आकारणी या महिन्याच्या बिलावर महावितरण करणार नाही. या काळात अनेक छोटे मध्यम व लघु उद्योग बंद आहेत.
त्यांच्यावर देखील या महिन्याच्या वीजबिलावर दंडाची आकारणी केली जाणार नाही.
तसेच सौर वीजप्रकल्प, सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीज खरेदीचा करार महावितरण सोबत केलेल्या ग्राहकांना त्यांची महावितरणकडील देयके वेळेवर दिली जातील. महावितरणची वीजबिल वसुली जरी बंद राहणार असेल तरीही या ग्राहकांना मात्र वेळेत नियमित देयके दिली जातील.
तसेच रोहित्र दुरुस्ती व अन्य आउटसोर्सिंग ठेकेदारांची देखील बिल वेळेवर दिले जातील.राज्यातील सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसाठी पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठा ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी रोहित्रांवर अतिरक्तदाब आहे. याची कल्पना महावितरणला आहे. या प्रश्नात ही अधिकाधिक लक्ष घालण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे.