संजय गवारी यांची मागणी
मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे नाचणी, वरई, भात पिकांबरोबरच बांधाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागांनी याचा पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी यांनी केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकर आणि आहुपे परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आहुपे, पिंपरगणे, कोंढवळ, डोण, निगडाळे, आघाणे, न्हावेड, नानवडे, तिरपाड, कोंढरे, आमडे, असाणे, माळीण, बोरघर, फुलवडे, पाटण, पिंपरी, कुशीरे खुर्द, कुशीरे बुद्रुक, राजपूर, तेरुंगण, सावारली, फलोदे, पोखरी, चिखली, जांभोरी, तळेघर, गोहे खुर्द इत्यादी गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने पडकईचा कार्यक्रम राबवून दगडी अनघड बांध घालून जमीनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसामुळे या ठिकाणी 250 ते 300 इंच पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते. शेती दुरुस्तीसाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. भात शेतीचे बांध गेल्यावर मोठे अनघड बांध लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि बैलांची आवश्यकता असते. यासाठी खर्चही अधिक येत असल्यामुळे भात लागवडीचे क्षेत्र कमी होत चालेले आहे. आदिवासी भागात भात हे एकमेव पीक असल्यामुळे भातशेती दुरुस्तीसाठी जास्तीचा निधी मंजूर करण्याची मागणी आदिवासी शेतकऱ्यांकडून होत आहे.