पुणे: राज्यातील पुरस्थिती ओसरल्यानंतर शेतकऱ्यांचे पंचनामे लगेच करा. आमच्याकडून आम्ही उसाचे बेणे देणार आहोत. त्याची तयारी केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान, महापालिका विरोधीपक्षनेते दिलीप बराटे यांनी राष्ट्रवादीचे महापालिका सदस्य १० लाख रुपये देणार असल्याचे सांगितले.
प्रशासन आणि सरकार पूर आलेल्या ठिकाणी मदतकार्यात कमी पडले असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. पवार पुढे म्हणाले, अलमट्टी धराणाबाबत आज बोलणार नाही. पण कोयानेतून जेवढे पाणी सोडायचे याचा तेथील इंजिनियरनी विचार केला असेल पण आलमट्टीत पाणी किती ठेवायचे याचा निर्णय बसून केला पाहिजे. काही वर्षांपूर्वी याबाबत विचार केला होता. पण आता पुनर्विचार करावा लागणार आहे. यावेळची परिस्थिती खूपच बिकट आणि मोठी आहे. असे शरद पवार म्हणाले.
राज्यात महापूर स्थिती पाहुन राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पूगग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार-आमदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे.