कराड – शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून नुकताच करण्यात आला आहे. या सर्व्हेत गतवर्षी कराड शहरात 45 तर यावर्षी 53 इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. संबंधित इमारतीच्या मालकांना इमारती उतरविण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र, इमारती मालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या इमारती ढासळल्यास जिवीत व वित्त होनी होऊ शकते याचा धोका ओळखून पालिकेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
कराड शहरात दिवसेंदिवस इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चाळीस वर्षापूर्वी दगड, माती आणि लाकडापासून बांधण्यात आलेल्या इमारतींची अवस्था आता अगदी गंभीर बनली आहे. काही इमारतींचे दरवाजे, भिंती खिळखिळ्या झाल्या आहेत. अनेक इमारती खाली वाकलेल्या आहेत तर कडीपाठ कुजला आहे. या जीर्ण झालेल्या इमारती पावसाळ्यात ढासळून जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी अगदी 20 वर्षापूर्वींच्या इमारतींचे नुतनीकरण करण्यात येते. त्यामुळे अशा धोकादायक इमारतीशेजारी एखादे बांधकाम सुरू असेल तर या जुन्या इमारती ढासळण्याची शक्यता असते.
शहरातील काही इमारतींच्या न्यायालयीन वाद सुरू आहेत. तर काही इमारतींच्या भाडेवाद सुरू असल्याने वर्षानुवर्षे या इमारती जैसे थे राहिल्या आहेत. शहरातील काही इमारती गजबजलेल्या ठिकाणी, रस्त्याकडेला आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून या धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण केले जाते. धोकादायक असणाऱ्या इमारतींना नोटीसा देण्यात येतात.
शहरातील गुरूवार पेठ येथे सर्वाधिक धोकादायक इमारती आहेत. तर बुधवार पेठ येथे सर्वात कमी धोकादायक इमारती आहेत. या इमारती उतरवून घेणे महत्वाचे असते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच दोन वर्षापूर्वी आझाद चौकातील 60 वर्षापूर्वीची डे नाईट केमिस्ट इमारतीसारखी अवस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे इमारत मालकांनी वेळीच याकडे लक्ष द्यावे. अन्यथा अनर्थ झाल्यास स्वत: इमारत मालक जबाबदार राहतील असा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. यातील अनेक इमारती या भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे इमारत मालकांना त्याचे काही घेणेदेणे नाही. अशांवर पालिकेकडून कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी संबंधित इमारत मालकांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र, त्यांच्याच काहीच फरक पडलेला दिसत नाही. उलट तात्पुरती डागडुजी करण्यावर भर दिला जातो. मात्र, या इमारती दगड व मातीपासून बनलेल्या असल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत. त्याचा धोका इमारत मालकांनी ओळखणे गरजेचे आहे. यंदाच्या पावसाळ्यात या इमारतीची पडझड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.