बंगळूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात देशासाठी काय योगदान दिले, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी बुधवारी केला. मोदींना विविध आघाड्यांवर सपशेल अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला.
एका प्रचारसभेत बोलताना कुमारस्वामी यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली. भाषणे देत आणि मते मागत मोदी देशभर फिरत आहेत. विकासाऐवजी ते देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मत देण्याचे आवाहन जनतेला करत आहेत. आपला देश कधीच असुरक्षित नव्हता हे जनतेने ध्यानात घ्यावे. मोदींनी देशाला काय दिले याचा विचार जनतेने करावा. त्यांनी शेतकऱ्यांना कुठला दिलासा दिला का? महिलांना सुरक्षा मिळाली का? बेरोजगार तरूणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या का? कुठली समस्या ते सोडवू शकले, अशा प्रश्नांची सरबत्ती कुमारस्वामी यांनी केली. भाषणशैलीच्या माध्यमातून मतदारांना स्वत:कडे खेचून मोदी सत्तेवर आले. मात्र, कुठल्याच आश्वासनाची पूर्तता ते करू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.