सलग तीन महिन्यांपासून होत आहे उत्पादन कपात
नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यापासून वाहनांच्या विक्रीत सातत्याने घट होत असल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आता वाहनांच्या उत्पादनावरही होऊ लागला आहे.देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने एप्रिल महिन्यातील उत्पादनात दहा टक्के कपात करण्यात आली होती, असे सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून मारुती सुझुकी उत्पादनात कपात करीत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत या कंपनीने उत्पादनात कपात केली होती. एप्रिल महिन्यात कंपनीने केवळ 1,47 669 कारचे उत्पादन केले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 1,63,368 कारचे उत्पादन झाले होत. मागणीअभावी कपात करावी लागली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मारुती सुझुकी इंडियाचे गुडगाव आणि मानेसर येथे दोन मोठे प्रकल्प आहेत. या ठिकाणी वर्षाला 15.5 लाख कार उत्पादन करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर सुझुकी कंपनीने गुजरात येथे एक प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची उत्पादनक्षमता 2.5 लाख असली तरी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात कारचे उत्पादन कधीच झालेले नाही. कारण त्या प्रमाणात मागणी नसल्याचे बोलले जाते.
घाऊक क्षेत्राबरोबरच किरकोळ क्षेत्रातही कारची विक्री कमी होत असल्याची आकडेवारी गेल्या पंधरवड्यात जाहीर झालेली आहे. यामुळे अनेक वितरकांनी काम थांबविले असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता मारुती सुझुकी कंपनीने उत्पादन कपात चालूच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.