दौंड – मुळ आराखड्यानुसारच खडकावसाला धरणाचे पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी सोमवार (दि. 10) उपोषण सुरू केले होते. यात आमदार राहुल कुल यांनी मध्यस्ती केली. त्यांच्या विनंतीवरून शासनाकडून लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करीत असल्याचे उपोषणकर्ते महेश भागवत यांनी सांगितले.
शेतकरी महेश भागवत, सत्वशिल शितोळे, पांडुरंग मेरगळ, अशोक फरगडे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांना विविध राजकीय पक्षांच्या, संघटनाच्या व ग्रामपंचायतींच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. याबाबत आमदार राहुल कुल यांनी सोमवारी तात्काळ जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता चोपडे यांच्याबरोबर चर्चा केली. व शासनाने लेखी आश्वासन दिले, तर हे उपोषण स्थगित होईल असे सांगितले. त्यानुसार चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास आमदार कुल, अधीक्षक अभियंता चोपडे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी उपोषण लेखी आश्वासन दिल्याने यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले.