31 जुलैपर्यंतचे नियोजन : पालख्यांसाठीही पाणी राखीव
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये अवघा 4.75 टीएमसी म्हणजे 16.28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातील 3.75 टीएमसी इतके पाणी 31 जुलैपर्यंत शहराला पिण्यासाठी तर उर्वरित 1 टीएमसी पाणी पालख्या आणि आकस्मिक तरतूद म्हणून राखीव ठेवण्यात आले आहे.
दौंड, बारामती, हवेली आणि इंदापूर तालुक्यांसाठी 12 एप्रिलपासून आवर्तन सुरू करण्यात आले होते. ते दि.10 मे रोजी बंद करण्यात आले. यामध्ये 28 दिवसांमध्ये कालव्याद्वारे सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले आहे. यापैकी 2.68 टीएमसी पाणी शेतीसाठी होते. तर उर्वरित 0.32 टीएमसी पाणी सुमारे 35 गावांसाठी टंचाई आरक्षण म्हणून दिले.
यात वरवंड येथील पाझर तलाव भरून ठेवण्यात आला आहे. हे पाणी बारामती तालुक्यातील सुपे आणि परिसरातील गावांना उपलब्ध होणार आहे. जूनमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून पुढे जाणार आहेत. पुणे शहर, हडपसर, फुरसुंगीपासून पाटसपर्यंत वारकऱ्यांना कालव्यातून पाणी दिले जाते, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.