अरुण गोखले
या वर्षीचा श्रावणमास मंगळवारपासून म्हणजेच पहिल्या मंगळागौरीच्या पूजेपासून सुरू होत आहे. मंगळागौर हे एक नूतन विवाहित स्त्रियांनी पहिली पाच वर्षे करायचे व्रत असून त्याचे पाचव्या वर्षी शास्त्रोक्त उद्यापन करायचे असते.
पूर्वी मुलींचे विवाह फार छोट्या वयात होत. त्यामुळे सासरी गेलेल्या मुली ह्यासुद्धा तितक्याशा चटकन त्या नव्या वातावरणात रुळलेल्या नसत. स्वाभाविकपणे त्यांना आपल्या माहेरची, घराची, तिथल्या माणसांची एकसारखी आठवण येत असे. त्यांची ती मानसिकता लक्षात घेऊन ह्या व्रताचे दूरदर्शी लोकांनी आयोजन केले होते, असे म्हणायला हरकत नाही.
कारण लग्नानंतर सासर आणि माहेर दोन्हीकडे साजरी होणारी मंगळागौर ही दोन्ही घरं, माणसे ह्यांच्यात गोडवा, आपलेपणा, जिव्हाळा, सामंजस्य या गोष्टी निर्माण करायला पुरक ठरतात.
या पूजेचा आणि पर्यावरणाचाही एक अतूट असा धागा जोडून दिलेला आहे. नुकताच सर्वत्र वसंत फुललेला, बहरलेला असतो.
पावसाने सृष्टी न्हाऊन निघालेली असते. या मंगळागौर पूजेसाठी सोळा प्रकारच्या पत्री नववधूने गोळा करायच्या असतात. त्यामागे निसर्गात जाणे, निसर्गवाचन करणे. पर्यावरणाची ओळख होणे. पाने-फुले, त्यांचे भिन्न भिन्न आकार, रंग, रूप, सुगंध या गोष्टी माहीत होणे हे त्या मागे अपेक्षित आहे. सध्या या सोळा पत्री गोळा केल्या जात नाहीत, तर विकत आणल्या जातात. असे असले तरी नववधूने निदान त्यांची नावे तरी माहीत करून घ्यायला हवी.
ही पूजा म्हणजेच सौभाग्यदात्री, मंगळकर्ती अशी जी देवी तिची ही पूजा. का? तर सुख, सौभाग्य, आनंद, समाधान आणि सुख प्राप्तीसाठी ही पूजा करावयाची आहे. मंगळागौरीच्या जागरणाच्या निमित्ताने खेळले जाणारे विविध खेळ, नृत्य, गायन यांसारख्या कलांना प्रोत्साहन देणारी आणि त्याच्या सादरीकरणास एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले असते.
सध्या तर हे जुने खेळ ज्यांना अवगत आहेत अशा हौशी महिला मंडळांसाठी त्याचे सादरीकरण हे एक व्यावसायिक साधन होऊ पाहात आहे. सध्या असे कार्यक्रम आयोजित करण्याकडे लोकांचा विशेष कौल आहे. आपल्या रूढी-परंपरांचा बारकाईने अभ्यास केला, त्यांची जाणकारांकडून नीट माहिती करून घेतली, तर “जुने ते सोने’ ही म्हण अनुभवांती पटण्यास काही हरकत नाही.