राजकीय हिंसाचार, डॉक्टरांच्या संपाबाबत व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली-पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार आणि डॉक्टरांचा संप यावरून केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, त्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून स्वतंत्र अहवाल मागवले आहेत.
पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारात 4 वर्षांच्या कालावधीत 160 जण मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याकडे केंद्रीय गृह मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. राजकीय हिंसाचाराचे सत्र सुरू राहण्याची बाब कायदा आणि सुव्यवस्थेची निश्चिती करणाऱ्या राज्याच्या यंत्रणांचे अपयश सूचित करते, अशा कानपिचक्या गृह मंत्रालयाने दिल्या आहेत.
तसेच, राजकीय हिंसाचाराला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याबाबत विचारणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी संप पुकारल्याने तेथील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर, संपासंदर्भातही तपशीलवार अहवाल देण्याची सूचना राज्य सरकारला करण्यात आली आहे. संपाला पाठिंबा दर्शवत पश्चिम बंगालमधील 300 हून अधिक सरकारी रूग्णालयांमधील डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. डॉक्टरांच्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरले आहे.