-काशिनाथ आल्हाट
चैत्र महिना पानाफुलांनी बहरतो त्याचवेळी अनेक सण, उत्सवांची मनात पालवी फुटते. देवदेवतांच्या यात्रा सुरू होतात. गावपुढारी गावाच्या चावडीवर बसून यात्रेचे नियोजन करतात. करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी गावपुढाऱ्यांचे व गावाचे एकमत होते. गावाच्या यात्रेला पाहिजे “तमाशा’. तमाशाशिवाय यात्रा नाही, जल्लोष नाही, यात्रेचा आनंद नाही. खरे तर गावयात्रेला तमाशा पाहिजे ही अनेक वर्षांपूर्वीची परंपरा होती. ती आजही आहे; परंतु ती पुढे टिकेल की नाही यावर भाष्य करणे आजच्या परिस्थितीत अवघड आहे.
पूर्वीचा तमाशा पारावर, चावडीवर, गावच्या माळरानावर होत असे. आता परिवर्तन झाले. तमाशा मालकांनी स्वतःचे रंगमंच उभे केले. वाहतुकीची साधने बदलली. पूर्वीच्या रंगमंचावरील रॉकेलची हिराळे गेली. आता चित्रपटातील रोषणाईने रंगत वाढविली. तमाशाच्या स्टेजवर पूर्वी गावचा पाटील, इनामदार फेटा उडवायचा. तमाशाला रंगत यायची. सवाल जबाबाची स्पर्धा व्हायची. त्यातूनच पुराणातील घटनांची उकल व्हायची. गणापासून सुरू झालेला तमाशा भैरवीपर्यंत म्हणजे पहाटे 6 वाजेपर्यंत होई. तमाशा कलावंत मनोभावे रसिकांची सेवा करायचे. त्यावेळी तमाशा कलेतील कलाकारांना “धन’ कमी होते पण “मान’ जास्त होता.
आधुनिक तमाशाच्या परिवर्तनात फिरत्या रंगमंचाप्रमाणे तमाशा रसिक बदलला आहे. तमाशातील पाटील गेला. तमाशा कलावंतांचे तमाशातील कलेचे नाते हे तात्त्विक स्वरूपाचे निर्माण झाले आहे. त्या कलेवरील निष्ठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. आजच्या तमाशा क्षेत्रातील कलेबद्दल “धन’ वाढले पण तमाशासृष्टीबद्दलचा “मानसन्मान’ कमी झाला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धन म्हणून आपण तमाशा कलेकडे पाहतो.
तमाशाच्या माध्यमातून लोक मनोरंजनातून प्रबोधन, संस्कृती, समाजपरिवर्तन, लोकशिक्षण, लोकशाही, समता, समानता यासारखी राष्ट्रीय मूल्यांची शिकवण नकळत स्वरूपात मिळते. राजा हरिश्चंद्र तारामती, भंगले स्वप्न महाराष्ट्रा, तांबड फुटल रक्ताच, रक्तात रंगली पहिली रात्र, झाशीची राणी, जहरी प्याला, ही झुंज मुरारबाजीची, रक्तात न्हाला बांगलादेश, मुंबईचा हमाल, मेवाडची राणी, महाराष्ट्र झुकत नाही, कोर्टादारी फुटला चुडा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सुनबाई डोरल बांधून जा, चितोडची राणी, विष्णू बाळा अशा अनेक वगनाट्याचे पूर्वी सादरीकरण केले जायचे. तमाशाच्या वगनाट्याची भैरवी कधी होऊच नये असे तमाशा रसिकांना वाटे. प्रचार प्रसारमाध्यमाच्या युगात एका क्लिकवर तमाशा पाहता येतो. परिवर्तन काळात मनोरंजनाची साधने प्रचंड झाली. त्यामुळे आजच्या तमाशा रसिकांची मानसिकता बदलली आहे.
तमाशाची सुरुवात गणाने होते. “गण’ गणरायाची आराधना रात्री आठ नऊला सुरू व्हायची. तमाशातील गण, गवळण, रंगबाजी, वगनाट्य असे टप्पे पार करीत शेवटी भैरवी आळवायला लागायची. तेव्हा सकाळच तांबड फुटणं बाकी असायचं हे सार काही तमाशा रसिकांना तोंडपाठ होत. तमाशाचा रात्रीच्या वेळीचा रंग वेगळाच असायचा. गौळण मथुरेच्या बाजाराला निघत आणि पेंधा आडवा येई. गवळणी आवाज देई. जमवुनी गौळणी जाऊ चला ग, मथुरेच्या बाजारा… या वेळी हलगी ढोलकीवाल्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी होती. महाराष्ट्राच्या माळरानावर पिढ्यान्पिढ्या उभा केलेला बहुरंग तमाशा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होते.
आजच्या रसिकांची गण ऐकून घेण्याची मानसिकता राहिली नाही. गणानंतर भगवान श्रीकृष्णाची आराधना असते. तीही अलीकडे पाहण्यास मिळत नाही. तमाशा कलाकारांनीसुद्धा परिवर्तन केले आहे. जसा रसिक आहे त्याच्या मनपसंतीनुसार तमाशाचे स्वरूप बदलत गेले आहे. तमाशातीत दोन गण, हळीच्या दोन गवळणी, कृष्णाची ओळख, कृष्ण गवळण असा तमाशाचा साज होता.
आजच्या तमाशा रसिकांची ती मानसिकता राहिली नाही. तमाशाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी सादर केल्या जातात त्याच्यात जास्त वेळ न दवडता तत्काळ फक्त चित्रपटातील प्रसिद्ध पावलेली गाणी, गीते, नृत्य सादर झाली पाहिजे याकडे कल असतो. आता गावातील कार्यकर्ता तरुण आहे. तो जे सांगेल तेच झाले पाहिजे. तसे न झाल्यास तो व त्याचे मित्र सवंगडी तमाशा बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल असते. नाचणे, धिंगाणा घालणे, आवाज करणे, मारामारी करणे, दंगल घडवून आणणे या सर्व स्थितीला तमाशा कलावंताना दररोज सामना करावा लागतो.
तमाशा फडमालक अथवा तमाशा कलाकारच ही लोककला टिकवू शकणार नाहीत तर यासाठी गावपुढारी, यात्राकमिटी, गावातील सुज्ञ विचारांचे तरुण यांनी पुढाकार घेतला पाहिजे. वर्षातून गावाची यात्रा एक दिवसाची असते. त्यासाठी गाववाले लाखो रुपये खर्च करीत असतात. वर्षभर गावकारभारी त्याचे नियोजन करीत असतात. या सर्व त्यांच्या कष्टांवर विकृत विचारांचे तरुण पाणी पाडतात. तरुण व्यक्ती, नशाखोर, विकृत विचारांच्या लोकांमुळे या गोष्टी घडतात. यासाठी गावपातळीवरती त्यांच्या बंदोबस्ताचा विचार झाला पाहिजे. जोपर्यंत गाव बैठकीत योग्य निर्णय घेतले जात नाहीत तोपर्यंत तमाशाला सुरक्षितता प्राप्त होणार नाही.
तमाशा कलेची सुरक्षितता ही चिंतनीय बाब झाली आहे. शासकीय पातळीवर याची दखल घेतली पाहिजे. तमाशाचा खेळ चालू झाल्यापासून ते पहाटे बंद होईपर्यंत त्यास सरकारी बंदोबस्त देणे गरजेचे आहे. तमाशा कला काही वर्षांनंतर लोप पावेल अशी आज परिस्थिती दिसून येते आहे. एका तमाशाफडात जवळपास 100 लोकांचा संघ असतो. वाहतुकीची साधने सरासरी तीन ते आठ असतात. प्रत्येक तमाशा फडाचा दररोजचा खर्च जवळपास 40 ते 45 हजार असतो.
कलाकारांचे पगार 15 हजारांपासून ते 30 हजारांपर्यंत असतात. या सर्व गोष्टींमुळे आज तमाशा फडमालक मेटाकुटिला आला आहे. त्यातूनच दुष्काळ परिस्थिती, निवडणुका, गावपुढाऱ्यांचे मतभेद या सर्व कारणांनी तमाशा कला मोडकळीस आली आहे. तमाशा फड केवळ आर्थिक मजबूत असेल तर तो टिकू शकतो. आर्थिक बाजू मजबूत नसल्याने अनेक तमाशा फड दिवाळखोरीस निघाले आहेत. अनेक तमाशा फड बंद झाले आहेत. आता सात महिन्याचे तमाशे फडसुद्धा मोजकेच राहिलेत. ते सुद्धा आर्थिकतेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
तमाशासृष्टी एकवेळ आर्थिक संकट सहन करील. पण तमाशावर होणारे हल्ले सहन करू शकणार नाही. तमाशातील कलाकारांचे जीवन सुरक्षित राहिले नाही. गावच्या यात्रा कमिटीचा, गावपुढाऱ्यांचा, गावकारभाऱ्यांचा धाक कमी झाला आहे. त्यामुळे गावातील विकृत विचारांच्या गावटुकारांपासून तमाशा कलावंतांना बेधडक मारहाण होते. मानसिक छळ होतो, विनयभंग केला जातो. त्याचा परिणाम म्हणून तमाशाचा कलाकार तमाशाकडे पाठ फिरवीत आहे. अलीकडे कलाकारांची संख्या कमी कमी होत आहे.
गावागावात तमाशांवर होणाऱ्या हल्ल्यांची दखल सरकारी दरबारी घेतली पाहिजे. नाहीतर श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणारसारखे हल्ले तमाशा कलावंतांवर होत राहतील. परिणामी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला, लोककलेला, तमाशासृष्टीला काळिमा लागेल. लोककला जोपासण्याऐवजी ती लोप पावेल. तमाशा संस्कृतीला नवी चैत्राची पालवीही फुटेल पण त्यासाठी तमाशा फडमालकांनी मानसिकता बदलली पाहिजे. महाराष्ट्रातील तमाशा फडमालक, तमाशा कलावंतांच्या संघटनांनी संघटित झाले पाहिजे. त्यांनी एकीचे बळ दाखविले पाहिजे. त्यामुळे तमाशासृष्टीला आर्थिक पाठबळ मिळेल व महाराष्ट्राच्या तमाशा लोकसंस्कृतीचे संवर्धन होईल.