गुवाहटी – पुराच्या हाहाकाराने आधीच परेशान असलेल्या आसाम आणि अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांना आज भूकंपाचे धक्के बसले असून 5.6 रिष्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू असून यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजून 52 मिनिटांनी आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅंड आणि अन्य भागांना भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
आसामला सध्या पुराचा तडाखा बसलेला असून या मुळे 29 जिल्ह्यातील तब्बल 54 लाख लोकांना आपला परिसर सोडून विस्थापीत व्हावे लागले असून या पुरामुळे आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आधीच पुरामुळे हाहाकार माजलेला असताना आज भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.