नवी दिल्ली – मावळत्या सरकारने आर्थिक सुधारणा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. जीएसटी आता स्थिरावला आहे. आगामी सरकारनेही उद्योग करण्यासाठी सुलभ वातावरण तयार करण्याची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कंपनी कर कमी करून 25 टक्के करावा अशी मागणी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने केली आहे.
या चेंबरचे अध्यक्ष राजीव तलवार यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षापासून भारताने जागतिक परिस्थितीची तुलना करता उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. मात्र, भारतातील गरीबी पाहता एवढ्यावरच विसंबून राहून चालणार नाही. पुढील काही दशके आपल्याला वेगवान विकासदर साध्य करावा लागणार आहे. त्यासाठी नव्या सरकारनेही प्रयत्न करण्याची गरज आहे.
पाच वर्षात उद्योगासाठी सुलभ वातावरणात बराच फरक पडलेला आहे. जागतिक बॅंक अशा वातावरणाचा आढावा घेऊन जगातील विविध देशांना गुणानुक्रम देते. भारताचा क्रमांक या यादीत 25 च्या आत येण्याची गरज असल्याचे तलवार यांनी सांगितले. निवडणुकांनंतर कोणतेही सरकार आले तरी त्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्था पुरेशा वेगाने पुढे जाईल याची काळजी घेण्याची गरज आहे.
पुढील पाच वर्षात निश्चितपणे भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरची होण्याची शक्यता आता गृहीत धरू धरली जाऊ लागली आहे. मात्र त्यापेक्षाही अर्थव्यवस्था मोठी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भारताला निर्यात वाढवायची असेल तर भारतीय कंपन्यांची उत्पादकता वाढण्याची गरज आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारतीय वस्तूचे दर किफायतशीर राहण्याची गरज आहे.
मात्र जास्त कंपनी करामुळे या वस्तूंच्या किमती इतर देशांच्या तुलनेत वाढतात. त्यामुळे कंपनी कर 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सुचविले. निर्यात वाढण्यासाठी इतरही अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे. तसे केले तरच भारताला आवश्यक तितकी रोजगारनिर्मिती करता येऊ शकेल. उद्योजकांच्या इतर संघटनांनीही रालाओ सरकारने बहुमताचा वापर करून विकासदर वाढवावा असे म्हटले आहे.