चासकमानमधून 52 हजार क्युसेकने विसर्ग : नदीला मोठा पूर
राजगुरूनगर- भोरगिरी-भीमाशंकर परिसरासह तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे भीमानदीला महापूर आला आहे. चासकमान धरणातून 52 हजार क्यूसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे, त्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे. धरणाखालील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने “रेड अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करून तो 26 हजार 475 क्युसेकने करण्यात आला.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सुदैवाने नागरिक बाहेर पडले नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
धरणाखालील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे .चास कमान धरणाचे अभियंता उत्तम राऊत यांनी सांगितले की भोरगिरी भीमाशंकर परिसरात अतिमूसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून 52 हजार क्युसेकने पाणी खाली सोडले जात होते. पावसाच्या प्रमाणात वाढच होत असल्याने या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते मात्र, सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.
तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून पुराचा आढावा घेतला जात आहे. तालुक्यातील पाभे, भोमाळे, पदरवाडी, जावळेवाडी या गावांवर लक्ष असून नागरिकांच्या अधिकारी संपर्कात आहेत.
या भागांत गेल्या 10 दिवसांपासून वीजपुरवठा बंद असल्याने माळीणसारखी दुर्घटना घडल्यास बचाव कार्यात अडथळे होणार आहेत. वीजपुरवठा व मोबाइल सुविधा सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत असून याकडे वीज वितरण विभाग व बीएसएनएलचे अधिकारी लक्ष देत नसल्याने याभागात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. दुर्घटना घडल्यास या अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरावे, अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.
- मध्यरात्री अतिवृष्टी; 500पेक्षा अधिक मिमी कोसळला
भोरगिरी भीमाशंकर परिसरात सलग 15दिवसांपासूनमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत असताना शनिवार (दि. 3) पासून या परिसरात अतिवृष्टी होत आहेत. तर सुमारे 500 पेक्षा अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. भुस्खलनाची भीती असलेल्या पदरवाडी, भोमाळे आणि जावळेवाडी गावातील नागरिक भीतीच्या छायेत असून पाभे गावाला भीमानदीच्या पाण्याचा विळखा पसरला असल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. पावसाचा जोर अद्यापही वाढत असल्याने नद्या-ओढे-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर तालुक्याच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर रस्त्यांवरील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. - दिवसभरातील अपडेट
तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी – सुमारे 500 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद
भीमेला महापूराचे स्वरूप
भीमा नदीवरील चास गावाजवळील पूल व अनेक मंदिरे पाण्याखाली
चासकमान धरणातून दुपारी चारनंतर 52 हजारांवरून 42 हजार, त्यानंतर 36 हजार तर सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून पाण्याच्या विसर्ग 26 हजार 475वर आला.
कोणतीही अनुचित घटना नाही.
सेल्फी बहाद्दरांच्या अतेताईपणामुळे राजगुरुनगरचा नवीन पूल वाहतुकीसाठी बंद
अंतर्गत पूल बंद केल्याने राजगुरुनगरला पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी